लोकसहभागातून काढणार निळोणा धरणातील गाळ
By Admin | Updated: April 12, 2015 00:03 IST2015-04-12T00:03:05+5:302015-04-12T00:03:05+5:30
दरवर्षी उन्हाळ्यात यवतमाळ शहरात पाणीटंचाई निर्माण होते.

लोकसहभागातून काढणार निळोणा धरणातील गाळ
‘प्रयास’चा पुढाकार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवाहन
यवतमाळ : दरवर्षी उन्हाळ्यात यवतमाळ शहरात पाणीटंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईचे मुख्य कारण म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात साचलेला गाळ होय. हा गाळ काढण्यासाठी आता प्रयास संस्थेने पुढाकार घेतला असून लोकसहभागातून धरणातील गाळ काढला जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ १३ एप्रिल रोजी होणार असून यवतमाळकरांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रयास संस्थेच्यावतीने येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाचे बांधकाम १९७२ साली पूर्ण झाले. या धरणाचे आयुर्मान ६० वर्षाचे असून आता ४३ वर्ष पूर्ण झाले आहे. या धरणात ३० ते ५० टक्के गाळ साचला आहे. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते.
पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणू नये यासाठी प्रयास संस्थेने धरणातील गाळ काढण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने २१ मार्चला गुढी पाडव्याला प्रकल्पस्थळी गुढी रोवून यवतमाळकरांनी मिशन डीप निळोणा या मोहिमेला सुरुवात केली. आता प्रत्यक्ष लोकसहभागातून गाळ काढला जाणार असून उन्हाळ्यात ५० हजार ट्रॅक्टर गाळ काढण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या संस्थेने दोन लाख रुपयाचा निधी संकलित केला असून जलतज्ज्ञांकडून माहिती अवगत केली असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
धरणातील सुपिक गाळामुळे शेतजमिनीचे आरोग्य सुदृढ होऊन पिकाची उत्पादकता वाढत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे या धरणातून निघालेला गाळ मागेल त्या शेतकऱ्याला मोफत आणि उपलब्ध प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात कार्यरत सामाजिक, व्यावसायिक उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रातील संघटनांची या अभियानासंदर्भात बैठक घेण्यात आली. ते या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला प्रयासचे डॉ. अविनाश सावजी, डॉ. आलोक गुप्ता, सुरेश राठी, डॉ. विजय कावलकर, प्रशांत बनगीनवार, डॉ. अनिल पटेल, कमल बागडी, अमोल साखरकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
शासनाचे सहकार्य
या जलदायी अभियानासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी ९ एप्रिल रोजी या प्रश्नावर संबंधित विभागाची बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही आपल्या अधिनस्त यंत्रणेची बैठक घेतली. कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी देखील या मोहिमेस महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत इंधन खर्च देण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने धरणातून गाळ काढण्याची परवानगी दिली असून या विभागाचे तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. वनविभागाकडून निळोणा मार्गावरील जलस्रोतावर बांध बंदिस्तींच्या कामाला मदत करणार आहे. महसूल आणि कृषी विभागाची ग्रामीण भागातील यंत्रणा आणि यवतमाळ नगरपरिषद देखील या कार्याकरिता यांत्रिक सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यवतमाळकरांना आवाहन
या जल अभियानात यवतमाळकरांनी सहभागी होऊन कुठल्याही स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानासाठी येरावार चौकात माँ दुर्गा दवाबाजार येथे संपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले असून यवतमाळकरांच्या कल्पना, सूचना कळवाव्या तसेच कुणाला याबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.