जिल्ह्यात मित्रांपेक्षा शिवसेनेची चाल पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:04 IST2017-09-08T22:04:34+5:302017-09-08T22:04:49+5:30
जिल्ह्यातील बळीराजाचे पाऊल दमदार करून अन्यायकारक सत्ताधाºयांना गाडण्याचे काम शिवसेना करीत आहे. यवतमाळात मित्रपक्षांपेक्षा शिवसेनेचे पाऊल पुढे असून सर्वांनी आपसातील मतभेद विसरून काम करण्याचे आवाहन ....

जिल्ह्यात मित्रांपेक्षा शिवसेनेची चाल पुढे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील बळीराजाचे पाऊल दमदार करून अन्यायकारक सत्ताधाºयांना गाडण्याचे काम शिवसेना करीत आहे. यवतमाळात मित्रपक्षांपेक्षा शिवसेनेचे पाऊल पुढे असून सर्वांनी आपसातील मतभेद विसरून काम करण्याचे आवाहन परिवहन मंत्री व शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांनी शुक्रवारी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले.
सध्या वाल्याचा वाल्मिकी करण्याचा सपाटा काहींनी लावला. यात गावगुंड, मटकेवाले, दारूगुत्त्येवाले सामावून घेतले जात आहे. कालपरवा याच जिल्ह्यातील एका मित्र पक्षाच्या आमदाराची भानगड कानावर आली. हा प्रकार पाहून रामायणातील वाल्यालासुद्धा संताप येत असेल, असा टोला त्यांनी लगावला. जिल्ह्यात मित्रपक्षाकडून आमचे अधिकार नाकारले जात आहे. आता जुन्या-नवीन शिवसैनिकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादीत केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती, नगरपरिषदांमध्ये शिवसेना समोर आहे. मित्रपक्षाकडून विरोधक उभा होऊ नये, विरोध होताच त्याच्या चौकशा लावल्या जातात. आता मित्रपक्षाकडून पदांची खैरात वाटली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी महसूर राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिवसेना शहर प्रमुख पराग पिंगळे यांनी केले. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार संजय गावंडे, माजी आमदार प्रकाश देवसरकर आदी उपस्थित होते.