पावसाने सोयाबीनचे मातेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:34+5:30
यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मुग आणि उडीद पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने कास्तकारांचे मोठे नुकसान होत आहे.

पावसाने सोयाबीनचे मातेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परतीच्या पावसाने कास्तकारांना चांगलाच हादरा दिला असून रविवारी बरसलेल्या पावसाने शेतपिकांच्या नुकसानीत आणखी भर घातली. दरवर्षी ८ ऑक्टोबरपर्यंत माघारी फिरणारा पाऊस यंदा लांबला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा मुक्काम वाढला आहे. यामुळे सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसण्याचे संकेत दिले आहेत.
यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मुग आणि उडीद पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने कास्तकारांचे मोठे नुकसान होत आहे.
सोयाबीनला उतारा कमी झाला आहे. त्यातही हातात पडणारे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. यामुळे पांढरी बुरशी पडून सोयाबीन कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोयाबीनच्या गंज्यामधून वाफा निघत आहेत. काळवंडलेले सोयाबीन हातात पडल्याने शेतकरी हादरले आहे. कापूस वेचणीसाठी गावामध्ये मजूरच मिळत नाही. यातून कापसाचेही नुकसान होत आहे. पावसाने बोंड सडून कास्तकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
भाजीपाला आणि फुलपिकांना पावसाने मोठा फटका बसला आहे. यावर्षी विजयादशमीला झेंडूची फुले विक्रीसाठी येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भाजीपाला उत्पादनाला पावसाने मोठ्या प्रमाणात मार बसला आहे. शेतकरी चिंतेत पडले आहेत.
पावसाचा वाढलेला मुक्काम धोकादायक
आंध्र आणि तेलंगानात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे वाऱ्याची गती कमी झाली आहे. बाष्प घेऊन येणारे ढग मोठ्या प्रमाणात विदर्भात आगेकूच करीत आहेत. या बाष्पयुक्त ढगांची संख्या वाढत असल्याने १५ ऑक्टोबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाचा वाढलेला मुक्काम पिकांसाठी हानीकारक आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस माघारी फिरतो. यावर्षी ८ ऑक्टोबरपर्यंत तो राहील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात कमी दाबाच्या पट्ट्याने यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम
आणखी लांबला आहे. पावसामुळे रबीचाही हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत.