मोबाईल टॉवर्समुळे धोका

By Admin | Updated: February 9, 2015 23:21 IST2015-02-09T23:21:48+5:302015-02-09T23:21:48+5:30

शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स उभे झाले आहेत. मात्र या टॉवर्समधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Mobile towers cause risk | मोबाईल टॉवर्समुळे धोका

मोबाईल टॉवर्समुळे धोका

वणी : शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स उभे झाले आहेत. मात्र या टॉवर्समधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्याच काळ आधुनिकतेचा आहे. या युगात जग अत्यंत जवळ आले आहे. क्षणभरात लाखो किलोमीटर अंतरावरील व्यक्तीशी संवाद साधणे अत्यंत सहज आणि सोपे झाले आहे. त्यासाठी भ्रमणध्वनीला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी आता खेडोपाडी भ्रमणध्वनी पोहोचले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी पोहोचल्याने अगदी गुराख्याच्या हातातही भ्रमणध्वनी दिसून येतो. गावोगावी एकाच घरात अनेक भ्रमणध्वनी असल्याची उदाहरणेही आहेत. काहींकडे तर दोन-दोन भ्रमणध्वनी आहेत.
भ्रमणध्वनीच्या ‘कव्हरेज’साठी अनेक गावांमध्ये टॉवर्स उभारण्यात आले आहेत. हेच टॉवर्स ग्रामस्थांसाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या टॉवर्समार्फतच संबंधित भ्रमणध्वनी कंपनी आपल्या ग्राहकांना सेवा पुरविते. त्यातून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे वातावरणातील प्रदूषण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो. सोबतच इतर पशु, पक्षांवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.
केंद्र सरकारने सन १९९६ मध्ये नवीन पर्यावरण संरक्षण कायदा अस्तित्वात आणला आहे. तथापि, या कायद्याची टॉवर्स उभारताना सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. या कायद्यानुसार टॉवर्स उभारणीसाठी काही मागदर्शक तत्वे पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या सूचनेनुसार टॉवर्स व ब्रॉडबँड मशिनरीमधून निघणाऱ्या लहरींमुळे मानव, वनस्पती, प्राणी, पक्षी, मासे आणि सूक्ष्मजीवांवर पेशीय, उपपेशीय, रेणूविय, उपरेणूविय जैवरासायनिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या लहरींमुळे मानवाला कर्करोग, हृदयरोग, डोळ्यांचे व हाडांचे आजार होण्याची शक्यताही विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने वर्तविली आहे. टॉवर्समधून निघणाऱ्या किरणोत्साराच्या लहरींमुळे लहान बाळांना व्यंगत्व, आंधळेपणा येण्याची शक्यताही मंडळाने वर्तविली आहे. हे टॉवर २०० फूट उंच असले, तरी त्यातून निघणाऱ्या उच्च किरणोत्सार लहरी २०० फूट समांतर जमिनीस सिमेंट काँक्रीटच्या भिंती भेदून आरपार जाऊ शकतात, असे मंडळानेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आता गावागावांत असे टॉवर्स उभे झाले आहे. भ्रमणध्वनी ही जीवनातील गरज झाली आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकाकडे भ्रमणध्वनी आला आहे. त्यावर अनेक ‘सोशीयल मीडिया’ची चलती आहे.
फेसबुक, व्हॉटस् अप यासारख्यांचा वापर वाढला आहे. परिणामी भ्रमणधनी ही अत्यंत गरजेची वस्तू झाली आहे. मात्र या भ्रमणध्वनीसाठी गावोगावी उभारण्यात येणारे टॉवर्स मानवी जीवनाला अपायकारक ठरण्याची शक्यता आहे. अनेक गावांमध्ये हे टॉवर्स विजेवर चालतात. वीज नसल्यास डिझेलचा वापर करण्यात येतो. त्यातूनही प्रदूषणाला चालना मिळते. त्यामुळे भ्रम्णध्वनी ही आवश्यक वस्तू झाली असतानाही त्याकडे जागृततेने बघण्याची गरज आहे. टॉवर्स किमान गावापासून दूर उभारण्यासाठी सर्वांनची प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Mobile towers cause risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.