‘मनरेगा’चे काम बंद तरीही ६७ मजूर उपस्थित
By Admin | Updated: January 8, 2015 23:02 IST2015-01-08T23:02:29+5:302015-01-08T23:02:29+5:30
बाभूळगाव तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे धूमधडाक्यात सुरू आहे. हजारो मजुरांच्या हातांना काम दिले जात आहे. त्यात बाभूळगाव ग्रामपंचायतही मागे नाही.

‘मनरेगा’चे काम बंद तरीही ६७ मजूर उपस्थित
बाभूळगाव : बाभूळगाव तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे धूमधडाक्यात सुरू आहे. हजारो मजुरांच्या हातांना काम दिले जात आहे. त्यात बाभूळगाव ग्रामपंचायतही मागे नाही. येथे तर मनरेगाचे काम कुठेही सुरू नसताना तब्बल ६७ मजुरांना कामावर दाखवून मस्टर भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव तालुका मनरेगा कामांच्या बाबतीत अग्रेसर आहे. या तालुक्यात मनरेगा अंतर्गत शेकडो कामे झाल्याने हजारो मजुरांच्या हाताला रोजगार मिळाला असल्याचे शासकीय अहवालांवरून दिसून येते. मात्र याच लोकोपयोगी मनरेगा योजनेचे तीनतेरा वाजविण्यात बाभूळगाव ग्रामपंचायतीने कुठलीही कसर सोडली नाही. बाभूळगाव ग्रामपंचायती अंतर्गत पांदन रस्त्याचे काम १ जानेवारी २०१५ ते ७ जानेवारी २०१५ या कालावधीत केल्याचे दाखविण्यात आले. या सात दिवसात पांदन रस्त्याच्या कामावर तब्बल ६७ मजूर राबल्याचेही ग्रामपंचायतच्या मस्टरवरून दिसून येते. मात्र असे कुठलेही काम सद्यस्थितीत बाभूळगाव ग्रामपंचायत अंतर्गत सुरू नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या कामांवर नव्या वर्षात गावातील ६७ मजूर राबले, हे एक न उलगडणारे कोडे बनले आहे. या सुरू नसलेल्या कामांचा विषय पंचायत समिती सभापती शशीकला दिघाडे यांच्या कक्षात गुरुवारी चांगलाच गाजला. या कामावर बोगस मजूर दाखविले असल्याचे उपस्थित सर्वांच्याच लक्षात आले. सभापती दिघाडे यांनी मनरेगाच्या संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा करण्यासाठी कक्षात बोलाविले असता त्या कर्मचाऱ्याने चक्क कार्यालयातून पळ काढला. संतप्त झालेल्या सभापतींनी हा सर्व प्रकार पाहून बोगस मजूर दाखवून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत ग्रामपंचायतचे सरपंच मारोतराव गाजलेकर यांना विचारणा केली असता सद्यस्थितीत गावात मनरेगाचे कोणतेही काम सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात नेमके ग्रामपंचायतचे कोण अधिकारी, पदाधिकारी गुंतले आहेत हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. बोगस मजुरांचा विषय कशा पद्धतीने हाताळला जातो व दोषींवर काय कारवाई होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)