कोळसा कंपनीकडून जनतेची दिशाभूल
By Admin | Updated: June 16, 2014 23:44 IST2014-06-16T23:44:46+5:302014-06-16T23:44:46+5:30
येथील कोळसा कंपनीने मागील आठ महिन्यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनाला केराची टोपली दाखविल्यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही कंपनी दिशाभूल करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

कोळसा कंपनीकडून जनतेची दिशाभूल
मुकुटबन : येथील कोळसा कंपनीने मागील आठ महिन्यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनाला केराची टोपली दाखविल्यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही कंपनी दिशाभूल करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
येथील खुल्या कोळसा खाणीच्या वाहनाने अडेगाव येथील देवेंद्र पालीवाल यांचा बळी घेतला होता. त्या घटनेला अनुसरून वातावरण तापले होते. संतप्त जमावाने बसस्थानक परिसरात टिप्पर जाळला होता. त्यानंतर जनक्षोम उसळला़ वातावरण तणावपूर्ण होते़ बसस्थानकासमोरच आंदोलनाला सुरूवात झाली होती. घटनास्थळाला तत्कालीन तहसीलदार ठमके यांनी भेट दिली़ पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही कोळसा कंपनीने त्यावेळी दिली होती.
पीडित पालीवाल कुटुंबियांनी बसस्थानकासमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी अनेक पुढाऱ्यांनी पीडित कुटुंबाला ३० लाख रूपये देण्याची मागणी केली होती. परंतु कोळसा कंपनीने कोणतीही हालचाल केली नाही. नंतर काही महिन्यांनी पीडित कुटुंबाला पाच लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर अनेकदा येथील ग्रामपंचायतीत कंपनी अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या. त्यात जनतेने २० च्या वर मागण्या मांडल्या़ त्यापैकी १८ मागण्या कंपनीने मंजूर करण्याचा प्रयत्न केला़ मात्र अद्यापही कंपनीच्या गेटपासून ते एका बारपर्यंत रस्ता पक्का झालाच नाही. रस्ता दुभाजकही तयार झाले नाही.
जनतेने कंपनीचे कोळसा वाहतूक करणारे टिप्पर रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र मागण्या पूर्ण होण्याआधीच कंपनी दिवसा वाहतूक सुरू करणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे़ दिवसा वाहतूक सुरू झाली, विपरीत परिणाम घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीने जनतेच्या मागण्यांना केराची टोपली न दाखविता मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)