गौण खनिजाची तस्करी
By Admin | Updated: February 4, 2016 02:31 IST2016-02-04T02:31:50+5:302016-02-04T02:31:50+5:30
महसूल विभागाची सातत्याने होत असलेली डोळेझाक यामुळे तालुक्यात गौण खनिजाची तस्करी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

गौण खनिजाची तस्करी
महसुलास चुना : नेर तालुक्यात वीटभट्टी चालकांना कर्मचाऱ्यांचे अभय
नेर : महसूल विभागाची सातत्याने होत असलेली डोळेझाक यामुळे तालुक्यात गौण खनिजाची तस्करी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशाच प्रकारात वीटभट्टी चालकांनाही अभय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या सर्व प्रकारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
रेती, मुरूम, माती या गौण खनिजाची बिनधास्त चोरी केली जात आहे. तहसील कार्यालयाकडून चार-दोन ट्रॅक्टरची रॉयल्टी काढायची आणि त्याआधारे ५० ते ६० ट्रॅक्टर गौण खनिज काढायचे, हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. कारंजा रोड, अमरावती रोड आणि शहरातील नबाबपूर परिसरात छुप्या पद्धतीने मुरूम काढला जात आहे. तालुक्याच्या विविध घाटांमधून उपसण्यात आलेल्या रेतीची परजिल्ह्यात वाहतूक केली जात आहे.
देवळी, वर्धा, बेंबळा प्रकल्प परिसरात असलेल्या घाटांमधून रात्री शहरात रेतीचे ट्रॅक्टर आणि ट्रक शिरत आहे. दिवसा माती आणि मुरूम आणला जात आहे. शिवाय तालुक्यातील छोट्या-मोठ्या प्रकल्पाच्या पात्रातील रेतीही बेसूमार उपसली जात आहे. शहरात रेतीचे ढिगारे लावता येत नाही. तसेच बांधकाम करणाऱ्यांना गरजेपेक्षा अधिक रेतीची साठवणूक करता येत नाही. परंतु संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे या बाबीकडे साफ दुर्लक्ष असल्याने जागोजागी रेतीचे मोठमोठे ढीग लागलेले आहे.
तालुक्यात २५ ते ४० वीटभट्ट्या सुरू आहे. वीटभट्टी मालकाकडून केवळ एक लाख वीट काढण्याची परवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी अधिक विटा काढल्या जातात. यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीचा हिशेबच राहात नाही. यासर्व प्रकारामध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल प्रशासनाकडून चार-दोन प्रकरणात कारवाई करण्यात येते. अनेक प्रकरणात कित्येक महिनेपर्यंत कारवाई होत नाही. त्यामुळे गौण खनिज तस्करांना अभय मिळत आहे. या प्रकारात शासनाचा मात्र कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. (तालुका प्रतिनिधी)