कोट्यवधीचे रस्ते रखडलेलेचे

By Admin | Updated: December 16, 2015 02:48 IST2015-12-16T02:48:10+5:302015-12-16T02:48:10+5:30

शेतशिवारांना जोडणाऱ्या पांदन रस्त्यावर दळणवळण सुलभ व्हावे यासाठी उमरखेड तालुक्यात ९३ पांदण रस्त्यांसाठी २० कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Millions of roads | कोट्यवधीचे रस्ते रखडलेलेचे

कोट्यवधीचे रस्ते रखडलेलेचे

लालफीतशाहीचा फटका : ९३ रस्त्यांना मंजुरी, २३ रस्ते अद्यापही अर्धवट
उमरखेड : शेतशिवारांना जोडणाऱ्या पांदन रस्त्यावर दळणवळण सुलभ व्हावे यासाठी उमरखेड तालुक्यात ९३ पांदण रस्त्यांसाठी २० कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु महसूल प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ७० रस्ते झालेच नाहीत तर २३ अर्धवट कामे रखडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अर्धवट रस्त्याच्या कामांमुळे मजुरांना रोजगार मिळत नाही.
शासनाने सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच शेतातील पीक घरापर्यंत नेण्यासाठी दळणवळण चांगले व्हावे पांदण रस्त्याची निर्मिती करण्याचे ठरविले आहे. या पांदन रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेतून केल्यास रस्तेही तयार होतील आणि मजुरांच्या हातालाही काम मिळेल. या दुहेरी हेतुने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये ९३ पांदण रस्त्यांना २० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्यातील २३ कामे सुरू केली तर ७० कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरुंग लागला आहे.
२० कोटी रुपयांचे पांदण रस्ते रखडले आहे. आता कुठे यातील २३ कामांना सुरूवात झाली. परंतु ते देखील अर्धवटच आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ही कामे देखील रखडलेली आहेत. तालुक्यात ७० पांदन रस्त्यांच्या कामाला सुरूवातच झालेली नाही, केवळ कागदोपत्री सगळकाही ठिकठाक दाखविण्यात आले आहे. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या २३ कामांमध्ये टाकळी ते राहून पांदन रस्ता हा २१ लाख २१ हजार रुपयांचा, टाकळी-इजारा भाग २ ते अमडापूर २१ लाख ४२ हजार, टाकळी-इजारा भाग ३ ते रामनाईक तांडा २१ लाख ३२ हजार, आरोग्य केंद्रापासून किनवट रोडपर्यंत अमडापूर रस्ता २१ लाख ३२ हजार, अमडापूर ते भवानी २१ लाख ३२ हजार, तिवरंग ते मुळावा २४ लाख २० हजार, धनज अंतर्गत खडीकरण १२ लाख १२ हजार, चुरमुरा ते दिंडोळा २४ लाख ६६ हजार, उमरखेड ते चुरमुरा २४ लाख ९४ हजार, तिवरंग-निरला पांदन रस्ता १६ लाख ३३ हजार, ब्राह्मणगाव ते बालाजी मंदिर भाग एक २२ लाख आठ हजार, ब्राह्मणगाव ते बालाजी भाग दोन २२ लाख १२ हजार, ब्राह्मणगाव ते बालाजी मंदिर भाग तीन २२ लाख १२ हजार आणि बालाजी मंदिर भाग चार १२ लाख ८२ हजार, पोफाळी ते कुपटी १८ लाख ७४ हजार या सोबतच मुरली, मोरचंडी, माणकेश्वर पार्डी, टाकळी, झाडगाव, नारळी, तरोडा, वरंदळी, बिटरगाव, जणूना, निंगनूर तांडा, कृष्णापूर, बेलखेड, परजना,
साखरा व इतर अशा ९३ गावांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, २० कोटी रुपयांची मान्यता या गावातील रस्त्यांसाठी देण्यात आली आहे.
परंतु महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ही सर्व कामे लालफीतशाहीत अडकली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या या कामांमुळे शेकडो मजुरांना मिळणारी कामेही आता रखडलेल्या कामांमुळे मिळत नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून एकाही मजुराला काम मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेकडो मजूर महानगरांकडे धाव घेत आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून उमरखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. रोजगारही नाही, एका वर्षात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामुळे तालुक्यातील रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावी असे मत आत्माचे तालुकाध्यक्ष सतीश वानखडे यांनी व्यक्त केले. तर महसूल प्रशासनाला रोजगाराबाबत ग्रामपंचायतने घेतलेल्या ठरावाची प्रत देऊन प्रलंबित कामे सुरू करण्याची मागणी केली असता, कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याचे परजना येथील सरपंच डॉ. अवधूत वाघमारे यांनी सांगितले.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Millions of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.