निवडणूक रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड
By admin | Published: March 26, 2015 02:09 AM2015-03-26T02:09:06+5:302015-03-26T02:09:06+5:30
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असताना कळंबला नगर पंचायतीचा दर्जा देण्याचे शासनाने जाहीर केले.
कळंब : ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असताना कळंबला नगर पंचायतीचा दर्जा देण्याचे शासनाने जाहीर केले. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द होणार असल्याने निवडणूक लढवू इच्छीनाऱ्यांचा हिरमोड झाला.
कळंबला नगर पंचायतचा दर्जा मिळणार, अशी चर्चा सुरू होती. परंतु अधिकारीस्तरावर कुठलीही पुष्टी होत नव्हती. दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी महसूल विभागाने सुरु केली होती. अशा स्थितीत निवडणूक ग्रामपंचायतीची की, नगर पंचायतीची होणार असा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे वेळेवर धावपळ नको म्हणून अनेक पक्षीय गटांनी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. अनेकांची उमेदवारीही पक्की झाली होती. परंतु आता नगर पंचायतीची निवडणूक होणार असल्याने नव्याने सर्व प्रक्रिया राबविली जाणार आहे. आता कमीतकमी सहा महिने कुठलीही निवडणूक होणार नसल्याने राजकीय पक्षांना मोर्चेबांधणीसाठी आपसुकच वेळ मिळाला आहे. सहा महिनेपर्यंत प्रशासक म्हणून तहसीलदारांची नेमणूक केली जाणार आहे. या काळात कुठलीही निवडणूक होणार नाही. त्यामुळे होणारी नगर पंचायत निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा वेगळी राहणार आहे. रणनीतितही बदल होणार आहे. कारण वॉर्ड व सदस्यांची संख्याही वाढणार आहे. (तालुका प्रतिनिधी)