‘मजीप्रा’ सर्वच आघाड्यांवर थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:35+5:30
निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर पोहोचला आहे.

‘मजीप्रा’ सर्वच आघाड्यांवर थंड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ शहरात सर्वच आघाड्यांवर संथ आहे. अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. नवीन योजनांच्या कामांची कासवगती आहे.
निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर पोहोचला आहे.
यवतमाळ शहरासाठी अमृत योजनेंतर्गत बेंबळाचे पाणी आणण्याची सर्कस अजूनही सुरूच आहे. २९ एप्रिल २०१७ रोजी या कामाचा कार्यादेश झाला. २७ आॅक्टोबर २०१९ पर्यंत ही योजना पूर्ण करायची होती. ३०० कोटींची योजना पूर्ण होणे तर दूर अजूनही पाईपच्या टेस्टींगवरच आहे.
बेंबळा प्रकल्प ते टाकळी फिल्टर प्लांटपर्यंत १८ किलोमीटर एक हजार मिमीचे पाईप टाकले गेले. परंतू सद्यस्थितीत केवळ १२ किलोमीटरचे टेस्टींग झाले आहे. सहा किलोमीटरसाठी दिवसं मोजावे लागत आहे. पाईप फुटले नसल्याचे समाधान प्राधिकरणाला आहे. मात्र फिटिंगमधील दोष काढताना नाकीनऊ येत आहे. टाकळी ते मजीप्रा कार्यालयापर्यंत आठ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. या पाईपचेही टेस्टींग पूर्ण झालेले नाही. स्थानिक कंत्राटदारांकडून ही कामे करून घेतली जात आहे. अनुभवाची वाणवा त्यांच्याकडे आहे.
भूमिगत गटार योजनेच्या कामाने यवतमाळ शहरातील काही भागांची दैना केली आहे. सुस्थितीतील आणि चकचकीत रस्ते फोडून काढले. इथपर्यंत ठीक आहे, पण गटार योजनेच्या कामाविषयी साशंकताच आहे. पाण्याचा अतिशय कमी वापर, वाहतुकीच्या रस्त्यापेक्षा खोल किंवा उथळ भागावर असलेले गडर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. काही ठिकाणी तर चेंबर आतापासूनच फुटायला सुरुवात झाली आहे.
योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी योजना हाती घेण्यात आल्या असल्या तरी त्या विद्यमान स्थितीत तरी डोकेदुखी ठरत आहे. योजनांना गती देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्यांची वाट लागू नये म्हणजे झाले
अमृत योजनेंतर्गत यवतमाळ शहरात पाईपचे जाळे विणण्यात आले. पाईपलाईन टाकलेल्या ठिकाणचे रस्ते गुळगुळीत झाले. मात्र पाईप लिकेज निघाल्यास या रस्त्यांवर पुन्हा भगदाड पडण्याची भीती आहे. नागरिकांच्या घरापर्यंत ११० एमएमचे पाईप अंथरले जात आहे. परंतु अजूनही काही भागात ते पोहोचले नाही. काही लोकांना जुन्या तर काहींना नवीन पाईपलाईनवरून पाणी पुरवठा होत आहे.
लॉकडाऊननंतर बेंबळाच्या कामाला अधिक गती देवून लवकरच पंपिंग सुरू केले जाईल. भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठलेही दोष नाही. सर्व कामे व्यवस्थित होत आहे.
- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा, यवतमाळ