पाणी विक्रेत्यांकडून टंचाईग्रस्तांची लूट

By Admin | Updated: May 18, 2016 02:44 IST2016-05-18T02:44:08+5:302016-05-18T02:44:08+5:30

एकीकडे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई असताना अशा स्थितीत ज्यांना शक्य आहे, ते आपापल्या परिने इतरांना मदत करीत आहेत.

Looters of scarcity-stricken water dealers | पाणी विक्रेत्यांकडून टंचाईग्रस्तांची लूट

पाणी विक्रेत्यांकडून टंचाईग्रस्तांची लूट

प्रशासन निद्रिस्त : दुष्काळाचा उपयोग स्वत:चा गल्ला भरण्यासाठी
यवतमाळ : एकीकडे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई असताना अशा स्थितीत ज्यांना शक्य आहे, ते आपापल्या परिने इतरांना मदत करीत आहेत. परंतु काही महाभाग याही परिस्थितीचा फायदा स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी करीत असल्याचे दिसून येते. अत्यल्प पाऊस आणि त्यातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा नियोजनाचा अभाव यामुळे यवतमाळ शहरात आज तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्या खासगी विहिरींना पाणी आहे, ते मात्र अव्वाच्या सव्वा दरात पाणी विक्री करीत आहेत.
यवतमाळ शहरात जीवन प्राधिकरणाकडून सध्या चार दिवसाआड, काही भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. काही भागात तर तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अशा स्थितीत नगर परिषदेकडून टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेकजण स्वत: खासगी टँकरद्वारा पाणी विकत घेतात तर काही ठिकाणी दोनचार नागरिक मिळून टँकर बोलावून पाणी वाटून घेतात. अनेकांकडे काही प्रसंगारुप पाण्याची अधिक गरज असल्यास टँकर शिवाय पर्याय नसतो. याचाच फायदा घेऊन ज्यांच्या विहिरींना अथवा बोअरवेलला पाणी आहे, असे महाभाग अव्वाच्या सव्वा दराने पाणी विकत आहेत. केवळ दोन हजार लिटर्स पाण्याचे तीनशे ते चारशे रुपये तर तीन हजार लिटर्सच्या टँकरचे पाचशे ते आठशे रुपये घेणे सुरू आहे. कोणत्याही पावतीशिवाय मनमानी करून ही पाणीविक्री सुरू आहे.
अनेकजण पिण्याचे पाणी बोअर किंवा विहिरीचे फिल्टर न करताच कॅनमध्ये भरून ३० ते ५० रुपयांपर्यंत या कॅनची विक्री करीत आहेत. या पाण्याच्या शुद्धतेची कोणतीही खात्री नाही. याकडे नगर परिषद व अन्न औषधी प्रशासन सारख्या सबंधित विभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालविले असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. याबाबत नगर परिषदेशी संपर्क साधल्यास खासगी पाणी विक्रेत्यांनी ते जास्तीत जास्त किती रुपयांना विकावे, याचे निकष आहेत. परंतु त्यापेक्षा जास्त दराने कुणी विक्री करीत असल्यास लेखी तक्रार करा त्यानंतरच आम्ही कारवाई करू असे सांगण्यात आले. तक्रार करून या टँकर माफियांशी दुश्मनी गोरगरीब लोक कसे घेतील, हे मात्र ते समजून घ्यायला तयार नाही. पाण्यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही, असे म्हटले जाते. पूर्वी दुष्काळ व पाणीटंचाईच्या परिस्थितीत ज्यांच्या विहिरींना पाणी असायचे, असे नागरिक स्वत:ची विहिर इतरांसाठी खुली करून देत होते, आज मात्र या पाण्याच्या पैशातून आपल्या सात पिढ्या कशा जगतील, याची तजवीज लावली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Looters of scarcity-stricken water dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.