कर्जमाफी १३७७ कोटींवर
By Admin | Updated: June 13, 2017 01:15 IST2017-06-13T01:15:30+5:302017-06-13T01:15:30+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची तत्वत: घोषणा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याचे संकेत आहे.

कर्जमाफी १३७७ कोटींवर
२६ जुलैची प्रतीक्षा : दोन लाख ८० हजार शेतकऱ्यांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची तत्वत: घोषणा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याचे संकेत आहे. मात्र कर्जमाफीचे धोरण २६ जुलैनंतर स्पष्ट होणार असल्याने कर्जमाफीचा आकडा त्यानंतर निश्चित कळणार आहे.
राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर मंत्रीगट आणि सुकाणू समितीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी तर मोठ्या शेतकऱ्यांना तत्वत: कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ८० हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. या शेतकऱ्यांकडे १३७७ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक लाख ९६ हजार ३६४ शेतकऱ्यांकडे ९२७ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये अल्प, अत्यल्पभूधारक आणि मोठ्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या ८४ हजार २०० शेतकऱ्यांकडे ४५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने जिल्हा बँकेच्या एक लाख दोन हजार अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५० कोटी रुपयांचे कर्जमाफ होण्याचे संकेत आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेच्या थकबाकीदारांचा आकडा गुलदस्त्यात आहे. २६ जुलैनंतर याबाबतचे धोरण स्पष्ट होणार असल्याने आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष २६ जुलैकडे लागले आहे.
शेतकऱ्यांना उत्तर देताना बँका हैराण
राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोमवारपासून कर्ज वाटप होईल, असे सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेसह विविध बँकांमध्ये शेतकरी कर्जासाठी धडकले. परंतु या शेतकऱ्यांना नेमके उत्तर देताना बँकेचे कर्मचारी हैराण झाल्याचे सोमवारी दिवसभर दिसत होते. अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक अशा निकषात बसणाऱ्या एक लाख शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी ५५० कोटी रुपये लागणार आहे. या पैशांची कुठलीही तरतूद राज्य शासनाने केली नाही, तसा कुठलाही आदेश निघाला नाही. प्रत्यक्षात जिल्हास्तरावर कर्जमाफी संदर्भात सोमवारी कुठलाही आदेश पोहोचला नव्हता. शासनाचा आदेश येईपर्यंत नवीन कर्ज मिळणार नाही, असे बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना वारंवार सांगत होते.
नोटांचा तुटवडा
सध्याच्या स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात चलनी नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. २५ हजारांचा धनादेश असला तरी दोन ते तीन हजार रुपये दिले जाते. यामुळे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळविताना मोठी अडचण येत आहे. बँकांमध्ये आणि एटीएमबाहेर रांगा लागल्या आहेत. अशातच कर्जमाफीनंतर नवीन कर्ज वितरित करावे लागल्यास चलनी नोटा आणाव्या कोठून असा प्रश्न बँकांपुढे उपस्थित झाला आहे.
कर्जमाफीसंदर्भात कुठलाही आदेश आला नाही. बँकांना पतपुरवठा कसा होणार याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. जोपर्यंत लेखी सूचना आणि पैसा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन कर्ज देता येणार नाही.
- अविनाश सिंघम
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक