पावसाने पिकांना जीवदान

By Admin | Updated: August 5, 2015 00:16 IST2015-08-05T00:16:14+5:302015-08-05T00:16:14+5:30

उपविभागात सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मध्यरात्री पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली होती.

Livestock rains to crops | पावसाने पिकांना जीवदान

पावसाने पिकांना जीवदान

उपविभागात रिमझिम : कापूस-सोयाबीन उत्पादक सुखावला
वणी : उपविभागात सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मध्यरात्री पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली होती. मंगळवारी दुपारपर्यंत रिमझीम पाऊस सुरूच होता. या पावसामुळे कपाशी व सोयाबीनला जीवदान मिळाले आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून तर मंगळवारी दुपारपर्यंत १० मीली पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मध्यरात्री अर्धा तास दमदार पाऊस व त्यानंतर रिमझीम पाऊस सुरूच होता. जवळपास गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने उपविभागात दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी कमालीचे चिंताग्रस्त झाले होते. पावसाअभावी कपाशी व सोयाबीनवर विविध अळींने आक्रमण केल्यामुळे पिकेही नष्ट व्हायला सुरूवात झाली होती. त्याचबरोबर तालुक्यातील कपाशी पिवळी पडून मरण्याच्या वाटेवर होती.
ही परीस्थिती पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. पाणी येत नसल्याने डोळ्यादेखत शेतकऱ्यांचे पिके वाळायला लागली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कशबशी जगविलेली पिके वन्यप्राणी नष्ट करीत होते. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढतच चालली होती. दरम्यान सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे या पिकांना आता जिवदानच मिळाले आहे. हा पाऊस कपाशी व सोयाबीन पिकासाठी पोषक असल्याने या पावसामुळे कपाशीची वाढ होणार आहे. पावसाअभावी अनेक पिकांनी माना टाकल्या होत्या. कपाशीची वाढ खुंटल्यामुळे पिके मरणाच्या वाटेवर होती. आता पाऊस झाल्याने या पिकांची परिस्थिती सुधरल्याचे दिसून येत होते. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आता पुन्हा मजुरांच्या शोधात भटकत आहे. आजपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे मजुरांच्याही हाताला काम नव्हते. मजुरांनाही आर्थिक अडचण भेडसावत होती. परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळे आता उर्वरीत शेती कामांना वेग येणार आहे. यावर्षी मजुरांची टंचाई भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांना बाहेर गावावरून शेतीकामासाठी मजुरांना वाहनाद्वारे आणावे लागत आहे. त्यामुळे त्यांना वाहनाचा अधिकचा भूर्दंडही सहन करावा लागतो. मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातसुद्धा पावसाने मध्यरात्री हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते. येत्या दोन-चार दिवसात पाऊस आला नसता, तर पिकांची काय अवस्था झाली असती, याचा विचार न केलेलाच बरा. उशीरा का होईना शेवटच्या घटकात पावसाने हजेरी लावल्यामुळे पिके धोक्याबाहेर असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Livestock rains to crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.