राजकीय गुरू सांगताना आमदारांची कसोटी
By Admin | Updated: July 31, 2015 00:09 IST2015-07-31T00:09:48+5:302015-07-31T00:09:48+5:30
आपला राजकीय गुरू कोण, हे सांगताना जिल्ह्यातील भाजपाच्या नवख्या आमदारांची चांगलीच कसोटी लागत आहे.

राजकीय गुरू सांगताना आमदारांची कसोटी
लोकमत विशेष
यवतमाळ : आपला राजकीय गुरू कोण, हे सांगताना जिल्ह्यातील भाजपाच्या नवख्या आमदारांची चांगलीच कसोटी लागत आहे. एका नेत्याचे नाव घेतल्यास दुसऱ्याची नाराजी ओढून घ्यावी लागेल. त्यातून लाभाचे पद मिळविताना अडचण होईल, असा विचार करून कुणी जनतेचा तर कुणी आईचा आधार घेतला. एका आमदाराने तर आपला राजकीय गुरू कोण, हे अखेरपर्यंत सांगणे टाळले.
शुक्रवारी गुरुपौर्णिमा आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे आणि त्यातही २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाचे आमदार म्हणून निवडून आलेल्यांचे राजकीय गुरू कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांना राजकीय गुरू सांगताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, कारण त्यांच्या आमदारकीच्या तीन ते चार टर्म पूर्ण झाल्या आहेत. त्यांचे राजकीय गुरू, गॉडफादर कोण हे सर्वश्रृत आहे. त्यांनी एखाद्या नेत्याचे नाव घेतले तरी दुसऱ्याला वाईट वाटणार नाही आणि वाईट वाटलेच तर या नेत्यांचे फारसे काही बिघडणार नाही, अशी स्थिती आहे. शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, भावनाताई गवळी, संदीप बाजोरिया, वामनराव कासावार, माणिकराव ठाकरे, संजय देशमुख, प्रकाश पाटील देवसरकर आदी अनुभवी नेते मंडळी आपला राजकीय गुरू कोण हे एका क्षणात सांगू शकतील. मात्र जिल्ह्यात पहिल्यांदाच निवडून आलेल्या भाजपा आमदारांची स्थिती या उलट आहे. आपला राजकीय गुरू सांगताना या आमदारांचा कस लागत असल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्यांदाच निवडून आलो, अजून वर्षही पूर्ण झाले नाही अशा स्थितीत कुणाचे नाव राजकीय गुरू म्हणून जाहीर करावे, असा पेच या आमदारांपुढे निर्माण झाला आहे. यातील कुणी नितीन गडकरींचे तर कुणी देवेंद्र फडणवीसांचे फॉलोअर आहेत. गडकरींचे नाव घेतल्यास फडणवीसांची नाराजी आणि फडणवीसांचे नाव घेतल्यास गडकरींची नाराजी ओढून घ्यावी लागेल, याची हूरहूर या आमदारांना आहे. कुणी सुधीर मुनगंटीवार यांना आपला राजकीय गुरू मानतो. मात्र जाहीर करू शकत नाही, अशी स्थिती आहे.
राज्यात आणखी चार वर्षे आमदार म्हणून युती सरकारमध्ये वावरायचे आहे. सरकारकडून मंत्रीपद, मंडळ, महामंडळ यासह अन्य काही लाभाची पदे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजकीय गुरू जाहीर केल्यास इतरांकडून त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खोडा घातला जाण्याची, पदाच्या स्पर्धेतून नाव बाजूला फेकले जाण्याची भीती या आमदारांना आहे. म्हणून राजकीय गुरूंचे नाव ‘लोकमत’पुढे उघड करताना या नेत्यांची केविलवाणी अवस्था पहायला मिळाली.
उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्या नावाची चर्चा आगामी मंत्रीमंडळ विस्ताराच्या निमित्ताने सुरू आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही चालविले आहे. एकाच वेळी ते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोघांनाही ‘तुम्हीच माझे सर्व काही’ हे भासविण्याचा प्रयत्न करतात. आपण दोघांच्याही संपर्कात आहोत, ही बाब उघड होणार नाही याची तेवढीच खबरदारीही घेतात. राजकीय गुरू कोण हे उघड करावे लागेल आणि त्यामुळे दोन पैकी एका नेत्याची नाराजी होईल, त्यातून मंत्रीपदाच्या शर्यतीतून पत्ता साफ होईल या भीतीने राजेंद्र नजरधने यांनी शेवटपर्यंत ‘लोकमत’ प्रतिनिधीला प्रतिसादच दिला नाही.
राळेगावचे भाजपा आमदार प्रा. अशोक उईके यांनी गडकरी, फडणवीस किंवा अन्य कुण्या नेत्याचे राजकीय गुरू म्हणून नाव घेण्याचे टाळले. त्यांनी आईचा आश्रय घेत तिच आपली राजकीय गुरू असल्याचे सांगितले.
वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनीसुद्धा आपले राजकीय गुरू म्हणून कोण्या ऐकाचे थेट नाव घेणे टाळले. जनता हीच आपली राजकीय गुरू असल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीन गडकरी, हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार, उद्धवराव येरमे या सर्वांनाच आपण गुरूस्थानी मानत असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
आर्णी-केळापूरचे आमदार राजू तोडसाम यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर हेच आपले राजकीय गुरू असल्याचे जाहीर केले. गडकरी, फडणवीस अथवा अन्य कुणाचे नाव घेतल्यास अहीर नाराज होण्याची भीती त्यांना असावी.
अनेक टर्म आमदार राहिलेल्या आणि आता मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या मदन येरावार यांनाही आपला राजकीय गुरू नेमका कोण हे स्पष्टपणे सांगता आलेले नाही. ते गडकरी-मुनगंटीवार गटाचे मानले जातात. मात्र या नेत्यांचे थेट नाव घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाराजी ओढावली जाण्याची व त्यातून मंत्रीपदाचा पत्ता कट होण्याची भीती येरावारांना असावी. म्हणून त्यांनी कोण्या एकाचे नाव न घेता भाजपातील सर्वच नेते आपले राजकीय गुरू असे सांगूण स्वत:चा बचाव करून घेतला.
दिग्रस-दारव्हा मतदारसंघात शिवसेनेकडून आमदारकीची हॅट्ट्रिक साधणाऱ्या पालकमंत्री संजय राठोड यांनासुद्धा आपला राजकीय गुरू कोण हे तत्काळ सांगणे काहीसे कठीणच गेले. सुरुवातीला जनसेवा हेच आपले राजकीय गुरू सांगणाऱ्या राठोड यांनी नंतर त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव जोडले. वास्तविक शिवसेनेत दिवाकर रावते हे राठोड यांचे राजकीय गॉडफादर मानले जातात. मात्र त्यांचे नाव घेतल्यास ‘मातोश्री’वरील व पक्षाचे मुंबईतील अन्य नेते नाराज होण्याच्या भीतीने राठोड यांनी ते टाळले असावे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांनी एका क्षणात आपले राजकीय गुरू कोण हे स्पष्ट केले. वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, शरद पवार हे आपले राजकीय गुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
पाच आमदारांना राजकीय वारसा नाही
जिल्ह्यातील विधानसभेच्या सातपैकी पाच आमदारांना राजकीय वारसा नाही. उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने, आर्णीचे राजू तोडसाम, राळेगावचे प्रा. अशोक उईके यांच्या घरात कुणीही राजकीय पदे मिळविली नाहीत, त्यामुळे त्यांना घरातून कोणतेही राजकीय बाळकडू मिळाले नाही. संजय राठोड, मदन येरावार यांनाही राजकीय वारसा नाही. स्वकर्तृत्व आणि परिश्रमावर त्यांनी आमदारकी मिळविली आहे. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना मात्र काही प्रमाणात का होईना घरातून राजकीय वारसा आहे. तोडसाम, नजरधने व उईके या आमदारांबाबत तर तेच त्यांचे राजकीय गुरू असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.