‘वसंत’च्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीत मोठी वाढ
By Admin | Updated: August 17, 2015 02:39 IST2015-08-17T02:39:16+5:302015-08-17T02:39:16+5:30
परंपरागत पिकांनी गत तीन हंगामात दगा दिल्याने वसंत सहकारी साखर कारखान्यासह चार साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची प्रचंड लागवड झाली आहे.

‘वसंत’च्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीत मोठी वाढ
महागाव : परंपरागत पिकांनी गत तीन हंगामात दगा दिल्याने वसंत सहकारी साखर कारखान्यासह चार साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची प्रचंड लागवड झाली आहे. मात्र संपूर्ण ऊस गाळपासाठी जाईल की नाही, अशी शंका आता शेतकऱ्यांना लागली आहे. दुसरीकडे वसंत साखर कारखान्याचे चाक फिरते की नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे सुधाकरराव नाईक साखर कारखाना कायमचा बंद आहे.
पुसद, महागाव, उमरखेड, हदगाव आणि हिमायतनगर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. वसंतमध्ये उसाच्या क्षेत्रात ३०९ हेक्टरची वाढ झाली आहे. एकीकडे आशादायी चित्र असताना दुसरीकडे साखर कारखान्यावर मरगळ आली आहे. वसंत कारखान्याच्या कामगारांना १० महिन्यांपासून पगार नाही. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. असे असताना कारखाना सुरू ठेवण्याची धडपड चालविली जात आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ९०५ हेक्टर उसाचे लागवड क्षेत्र आहे. २०१३-१४ मध्ये ५९६ हेक्टर उसाची नोंद होती. २०१४-१५ च्या हंगामात पूर्व हंगामी ३७५.८० हेक्टर आणि खोडवा ४०२ हेक्टर लागवड झाली आहे. वसंतच्या ऊस नोंदणीत ३०९ हेक्टरने वाढ दिसत आहे. अशा स्थितीत विदर्भात एकमेव वसंत सहकारी साखर कारखाना सुरू आहे. उमरखेडच्या शेजारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे चार साखर कारखाने आहे. बागलवाडा, हुतात्मा हदगाव, भाऊराव भोकर आणि डोंगरकडा असे चार कारखाने सुरू आहेत. भाऊराव सहकारी तत्वावर तर तीन कारखाने भाडे किंवा मालकी तत्वावर सुरू आहे.
विदर्भातील वसंतची स्थिती नाजूक झाली आहे. गुंजचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. मांगूळचा साखर कारखाना डेक्कन शुगरने विकत घेतला आहे. अशा स्थितीत या उसाचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. उसाचे क्षेत्र वाढत असताना गाळप क्षमता मात्र तेवढीच आहे. शेतातील ऊस यावर्षी शेतातच जाळावा तर लागणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. (तालुका प्रतिनिधी)