कृषिपंपाची वीज बिल थकबाकी १२०० कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:05+5:30
कृषीपंपावर १६ तासांचे भारनियमन आहे. तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने ओलितही करता येत नाही. याचा परिणाम सिंचनावर झाला आहे. ‘झिरो लोडशेडींग’च्या नावावर तासन्तास वीज गायब असते. डीपीवरचे फेज वारंवार उडतात. लाईन ट्रिप होते. यानंतरही अनेक दिवस विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निसर्ग प्रकोप आणि शेतमालास न मिळणारे दर यामुळे शेतकऱ्यांना कृषीपंपाचे वीज बिलही भरता आले नाही. अनेक वर्षांची ही थकबाकी आता १ हजार २०१ कोटींच्या घरात पोहचली आहे. या थकबाकीमुळे कृषीपंपावरीला विजेचा पुरवठा १० तासापर्यंतच मर्यादित राहिला आहे.
कृषीपंपावर १६ तासांचे भारनियमन आहे. तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने ओलितही करता येत नाही. याचा परिणाम सिंचनावर झाला आहे.
‘झिरो लोडशेडींग’च्या नावावर तासन्तास वीज गायब असते. डीपीवरचे फेज वारंवार उडतात. लाईन ट्रिप होते. यानंतरही अनेक दिवस विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे कृषीपंपाची वीज शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
जंगली श्वापद, शेतमालास न मिळणारे दर यामुळे शेतकºयांना शेतीचा खर्चही काढता आला नाही. अशा स्थितीत वीज बिल भरायचे कसे, हा प्रश्न आहे. आता थकबाकी, त्यावर पडलेले व्याज, दंड यातून थकबाकी १ हजार २०१ कोटी ८७ लाखांच्या घरात पोहचली आहे. पुढील काळात ही थकबाकी आणखी वाढणार आहे.
एक लाख १५ हजार ग्राहक अडचणीत
वीज कंपनीने थकबाकी कमी करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली. मात्र शेतकºयांच्या खिशातच पैसा नसल्याने त्यांना थकबाकी भरता आली नाही. यातून थकबाकीचा आकडा वाढला आहे. एक लाख १५ हजार कृषीपंपधारक अडचणीत सापडले आहेत. यामुळे वीज कंपनीही अडचणीत आली आहे.
सोलर युनिट उत्तम पर्याय
कृषीपंपाला वीजपुरवठा करणारी वीज वाहिनी सौरउर्जेने बनविली. त्यावरून विजेचा पुरवठा केला तर शेतकºयांना दिवसाच वीज मिळेल. कृषीपंपाच्या वीजबिल थकबाकीचा प्रश्नच उरणार नाही, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.