भाजीपाला दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:02+5:30
लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल झाला. हे नुकसान शेतकऱ्यांना कधीही भरुन निघणार नाही, असेच होते. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. आता ८०० ते हजार एकरवर भाजीपाला शिल्लक राहिला आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर कडाडले. जिल्ह्यातील भाजीपाल्यांना मिळणारे दर लक्षात घेता इतर जिल्ह्यासह इतर राज्यांनीही जिल्ह्याकडे नजर वळविली आहे.

भाजीपाला दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. यामुळे भाजीपाला क्षेत्रात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. याचा फटका गृहिणी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात भाज्यांचे दर वधारतात. यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांनी पाच हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली. मार्चमध्ये कोरोनाचा आजार बळावला आणि तेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झाले. यामुळे भाजीपाल्याची विक्रीच शेतकऱ्यांना करता आली नाही. लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल झाला. हे नुकसान शेतकऱ्यांना कधीही भरुन निघणार नाही, असेच होते. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. आता ८०० ते हजार एकरवर भाजीपाला शिल्लक राहिला आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर कडाडले. जिल्ह्यातील भाजीपाल्यांना मिळणारे दर लक्षात घेता इतर जिल्ह्यासह इतर राज्यांनीही जिल्ह्याकडे नजर वळविली आहे. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश शिवाय नाशिक, पुणे, औरंगाबाद, बुलडाणा, संगमनेर या ठिकाणावरूनही भाजीपाल्याची आवक जिल्ह्याच्या बाजारपेठेत झाली आहे. याचा फायदा इतर राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे.
हॉटेल व्यवसायाचा भेंडीवर परिणाम
भेंडी सर्वाधिक आवडीची भाजी म्हणून विकली जाते. हॉटेलमध्ये याचा सर्वाधिक वापर होतो. हॉटेल व्यवसाय बंद आहे. यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेली भेंडी खरेदी करणारे ग्राहक घटले आहे. परिणामी भेंडीचे दर भाजीबाजारात जैसे थे असेच आहे. जुलै महिन्यात पावसाने भेंडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतरही भेंडीच्या दरात कुठलीही सुधारणा झाली नाही. सध्या भेंडीचे दर ४० रुपये किलो आहे.
या कारणामुळे भाज्यांचे भाव वाढले
भाजीपाल्याचे क्षेत्र जिल्ह्यात कमी झाले. या ठिकाणी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांची लागवड केली. आता भाजीपाल्याचे क्षेत्र खरिपाखाली आल्यामुळे मोजक्याच क्षेत्रावर भाजीपाला लागवड शिल्लक राहिली आहे. परिणामी भाज्यांचे दर वधारले.
कोरोना कधीपर्यंत कायम राहील याचा नेम नाही. यामुळे भाजीपाला उत्पादकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी भाजीपाल्यांची वाडी रिकामी केली आहे. या ठिकाणी मूग आणि उडदाची लागवड केली आहे. यातून डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढणार आहे.
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. आठवडी बाजार बंद आहेत. अशा परिस्थितीत गरज पूर्ण करण्यासाठी परराज्यातून भाजीपाल्याची आवक करण्यात येत आहे. याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे.