हरियाणाचे बॅग लिफ्टर जेरबंद
By Admin | Updated: June 12, 2017 01:58 IST2017-06-12T01:58:57+5:302017-06-12T01:58:57+5:30
एसटी बसमधील प्रवाशांची बॅग चिरुन ऐवज लंपास करणारी हरियाणातील चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी यवतमाळात

हरियाणाचे बॅग लिफ्टर जेरबंद
तिघे पसार : यवतमाळ बसस्थानकावर टोळी विरोधी पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटी बसमधील प्रवाशांची बॅग चिरुन ऐवज लंपास करणारी हरियाणातील चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी यवतमाळात शनिवारी रात्री टोळी विरोधीपथकाने जेरबंद केली. सातपैकी चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. यवतमाळसह अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
यवतमाळ बसस्थानकावर गत काही दिवसात बॅग लंपास होण्याच्या घटना घडल्या. परंतु चोरटे हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी महिला पोलीस विभावरी ढवस, वैशाली मेंढे यांना साध्या वेषात तैनात केले. दोन महिन्यानंतर शनिवारी रात्री सुगावा लागला. पोलिसांनी सापळा रचून चौघांना बसस्थानकावरून शनिवारी रात्री अटक केली. सुनील कुमार छोटाराम मलक (माला) (३३), विरेंद्रकुमार श्रीभरतसिंग माला (३२) दोघे रा. अशफरगढ ता. जिंद (हरियाणा), राकेशकुमार छत्रसिंग बिडू (३३) रा. जैब्रान ता. मेहर जि. रोहतक (दिल्ली), प्रकाश खुलाराम माला (५०) रा. सुलतानपुरी शनिबाजार रोड, जुनी दिल्ली, अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहे. राकेशकुमार बिडू याच्या खिशात चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले. बॅग फाडणे व लॉक तोडण्यासाठी टी आणि एल आकाराचे धारदार शस्त्रही आढळले. त्यांनी यवतमाळात महिलांचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात टोळीविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघन, अमोल चौधरी, योगेश गटलेवार, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाने, विनोद राठोड, बंडू मेश्राम, आकाश सहारे, गौरव ठाकरे, जयंत शेंडे, प्रवीण मेंगरे यांनी केली.
भाषेने बिंग फुटले
बसस्थानक परिसरात काही जण वेगवेगळ्या भाषेत चर्चा करीत होते. ही भाषा आपल्याकडील नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांना ताब्यात घेतले आणि या टोळीचे बिंग फुटले. यवतमाळवरून दोन महिलांचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली. यामध्ये यवतमाळ-कारंजा प्रवासात ७ फेब्रुवारी रोजी सरला महाजन यांचे ७० हजारांचे दागिने चोरी गेले होते. या घटनेचा छडा लागला असून मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.
अशी आहे गुन्ह्याची पद्धत
हरियाणातील ही टोळी दिल्लीवरुन नागपूरला उतरल्यानंतर चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, चिखली, जालना असा प्रवास सातत्याने करते. प्रवासादरम्यान सौजन्याचा आव आणूण महिला, वृद्ध यांना बसमध्ये बसायला जागा देणे, बसस्थानकावर जड बॅग असलेल्यांना मदत करणे, अशा पद्धतीने सलगी करून ही टोळी गुन्हे करते. सभ्यतेचा आव आणून गुन्हा करण्याची पद्धत आहे. चोरीचा माल हरियाणात विक्रीसाठी नेला जात असल्याचे त्यांनी सांगितले.