यवतमाळ भाजीमंडईतील हर्रास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:00:45+5:30

विठ्ठलवाडीतील भाजी मंडई सुदर्शन ठोक भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चालविली जाते. या संघटनेअंतर्गत सर्व भाजी अडते काम करतात. रात्री ३ वाजतापासून भाजी मंडईचे कामकाज सुरू होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक प्रतिबंध येथील व्यवहारावर आले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही.

Harras closed in Yavatmal vegetable market | यवतमाळ भाजीमंडईतील हर्रास बंद

यवतमाळ भाजीमंडईतील हर्रास बंद

ठळक मुद्देठोक भाजी विक्रेत्यांचा निर्णय : सील केलेल्या भागातूनही येतात किरकोळ खरेदीदार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संसर्गाचा धोका थांबविण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. येथील मुख्य भाजी मंडईत खरेदीसाठी थेट सील केलेल्या भागातील खरेदीदार येत असल्याने भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनने गुरुवारपासून भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून भाजी मार्केटमध्ये सुविधा मिळत नाही. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, यातून जीविताला धोका असल्याची चिंता असोसिएशनने व्यक्त केली आहे.
विठ्ठलवाडीतील भाजी मंडई सुदर्शन ठोक भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चालविली जाते. या संघटनेअंतर्गत सर्व भाजी अडते काम करतात. रात्री ३ वाजतापासून भाजी मंडईचे कामकाज सुरू होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक प्रतिबंध येथील व्यवहारावर आले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही. भाजी मार्केटमध्ये जंतू नाशकाची फवारणी करावी, अशी मागणी नगरपरिषदेकडे वारंवार केली. त्यानंतरही याकडे लक्ष दिले जात नाही. किरकोळ भाजी विक्रेत्यासोबतच काही घरगुती खरेदीदारही मंडईत येतात. येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. भाजी खरेदी-विक्रीही प्रत्यक्ष हात लावूनच केली जाते. कोरोना रुग्ण सापडलेल्या प्रतिबंधित भागातून मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते मंडईत येतात. प्रतिबंधित भागातील विक्रेते घराबाहेर पडतातच कसे हे कोडे आहे. यातून शहरात कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची भीती आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने अडचणीच्या काळातही मंडईतील हर्रास बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
पोलिसांच्या जाचक अटींमुळे अनेकदा भाजीपाल्याची विक्री होत नाही. किरकोळ विक्रेत्यांना उधारीत माल द्यावा लागतो. यामुळे ठोक विक्रेत्यांचेही नुकसान होत आहे. नगरपालिकेचे पथक येऊन मंडईत मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे यांच्याबद्दल थेट ठोक भाजी विक्रेत्यालाच जबाबदार धरतात. त्यांच्या दंडात्मक कारवाईची भीती वाटते. या सर्व कारणांनीच ठोक भाजी विक्रेता असोसिएशनने व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अत्यावश्यक सेवेच्या पासनंतरही पडतात लाठ्या
ठोक व किरकोळ भाजी विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवेची पास दिली आहे. त्यानंतरही रात्री ३ वाजता भाजीमंडईत जाताना पोलिसांकडून हटकले जाते. एका किरकोळ भाजी विक्रेत्याला पोलिसांच्या लाठ्या बसल्या. यात त्याच्या हाताचे बोटही फ्रॅक्चर झाले. संकटकाळात सेवा देणे हा आमचा उद्देश आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने आणखी धोका पत्करू शकत नाही, असे भाजी विक्रेत्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास या संकटात ठोक भाजी विक्रेते काम करायला तयार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान व किरकोळ विक्रेत्यांचा रोजगार बुडतो, त्यामुळे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.
- गजानन बरे
अध्यक्ष, ठोक भाजी विक्रेता असोसिएशन.

Web Title: Harras closed in Yavatmal vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.