बोंडअळीच्या उद्रेकात सरकारी सापळे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:32 IST2018-07-29T23:30:51+5:302018-07-29T23:32:24+5:30
शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता.

बोंडअळीच्या उद्रेकात सरकारी सापळे गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात नऊ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा अहवाल ताजा असतानाच शनिवारी सायंकाळी आणखी दोन शेतकºयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
किसन सुखदेव देशपांडे (३६) रा.लिंगा बोरगाव ता.नेर, संदीप भिखू पवार (३६) रा.वाईबाजार ता.माहूर असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. कृषी विभागाने फवारणीसंदर्भात गावपातळीवर जनजागृती केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नावाने कोट्यवधीचा निधी लाटणाऱ्या तंत्रज्ञांनीसुद्धा जुलै महिन्यातच आलेल्या अळीच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस या दोन्ही प्रमुख पिकांवर कमी-अधिक प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी शेतकरी परंपरागत पद्धतीनेच फवारणी करत आहे. त्याला कृषी विभागाचे सहकार्य व मार्गदर्शन नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फवारणी विषबाधेने गंभीर झालेल्या शेतकºयांवर उपचार सुरू आहे. दोघांनाही अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. कृषी केंद्र चालकांच्या सल्ल्यानेच शेतकरी कीड नियंत्रणाचा प्रयत्न करत आहे. यातच काही प्रतिबंधित औषधी फवारणीतून शेतकºयांच्या जीवाला धोका आहे.
गुणवत्ता पथक तडजोडीत व्यस्त
स्थानिक कृषी कार्यालयाचे कामकाज कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालते. ठराविक कर्मचाऱ्यांना घेवून येथे तडजोडीचा व्यवहार चालतो. गुणवत्तेकडे दुर्लक्ष असल्याने या पथकाच्या एकूण कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरू ठेवून नेमक्या कोणत्या फाईली काढल्या जातात, याची चर्चा कृषी वर्तुळात सुरू आहे.
ना ट्रॅप मिळाले, ना किट मिळाल्या !
कृषी विभाग क्रॉपसॅप योजने अंतर्गत ‘फेरोमन ट्रॅप’ गावामध्ये पुरविणार होता. प्रत्यक्षात हे ट्रॅप अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. विशेष म्हणजे, फवारणी करताना वापरण्याच्या किटही शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या नाही. त्यासंदर्भात जाणीवजागृती करण्यात कृषी विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. शेतकरी आणि शेतमजूर किटविनाच फवारणी करताना पाहायला मिळत आहे. याचा फटका यावर्षी नऊ शेतकरी आणि शेतमजुरांना बसला.