यवतमाळ जिल्ह्यांत वीज कोसळून 6 ठार, कळंब, राळेगाव आणि दारव्हा तालुक्यांतील घटनांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:51 IST2017-10-05T16:54:30+5:302017-10-05T18:51:42+5:30
जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले.

यवतमाळ जिल्ह्यांत वीज कोसळून 6 ठार, कळंब, राळेगाव आणि दारव्हा तालुक्यांतील घटनांचा समावेश
यवतमाळ : जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले.
चंदा शंकर रामगडे (६०), तेजस्वीनी शंकर रामगडे (२५), मधुकर पुरुषोत्तम ठोंबरे (३०) सर्व रा. आमला ता. कळंब, हेमंत श्रीकृष्ण थरकडे (२५) रा. पाभळ ता. दारव्हा आणि मंजुळा चंद्रभान राऊत (६५) रा. निमगव्हाण ता. कळंब, अशी मृतांची नावे आहे. तर सुमित्रा माणिकराव अंबाडारे (४२), विजय माणिक अंबाडारे, दिनू चंद्रभान राऊत हे जखमी झालेत. कळंब तालुक्यातील आमला येथील चंदा आणि तेजस्वीनी या मायलेकी मक्त्याने केलेल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली. त्यात दोघेही जागीच ठार झाल्या. तर याच गावातील मधुकर ठोंबरे हा एका शेतात काम करीत असताना वीज कोसळून ठार झाला.
राळेगाव आणि कळंब तालुक्याच्या सीमेवर असलेल्या निंबगव्हाण, वरणा शिवारात गुरुवारी दुपारी २ वाजता कापूस वेचण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज मजुरांच्या अंगावर पडली. त्यात मंजुळा राऊत जागीच ठार झाल्या. तर इतर तिघे जण जखमी झाले. अचानक वीज कोसळल्याने सर्वच जण बेशुद्ध पडले होते. काही वेळाने विजय अंबाडारे आणि दिनू राऊत यांना शुद्ध आली. पाहतात तर काय मंजुळाबाई ठार झालेल्या आणि सुमित्राबाई गंभीर जखमी होत्या. या जखमींना तत्काळ राळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून यवतमाळला हलविण्यात आले. तिसरी घटना दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे घडली. हेमंत श्रीकृष्ण थरकडे (२५) हा आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचणीवर लक्ष ठेवण्यासाठी गेला होता. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक अंगावर वीज कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत प्रथम लोणी आणि नंतर आर्णी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी हेमंतला मृत घोषित केले.