पुसदमध्ये मास्क न लावणाऱ्या १०० जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:30+5:30
पोलिसांनी शनिवारी मास्क न लावणारे व विनाकारण डबल सिट भटकणाऱ्या तब्बल १०० नागरिकांविरुद्घ दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास २२ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये एका किराणा दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने त्यालाही दोन हजार रुपये एवढा दंड लावण्यात आला.

पुसदमध्ये मास्क न लावणाऱ्या १०० जणांना दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना घरीच थांबा व सुरक्षित राहा, असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर विना मास्क फिरताना आढळून येत असल्याने प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. प्रशासनाने शनिवारी दुसऱ्या दिवशीही धडक मोहीम राबवून १०० जणांवर कारवाईचा बडगा उगारला.
पोलिसांनी शनिवारी मास्क न लावणारे व विनाकारण डबल सिट भटकणाऱ्या तब्बल १०० नागरिकांविरुद्घ दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास २२ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये एका किराणा दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने त्यालाही दोन हजार रुपये एवढा दंड लावण्यात आला.
येथील गांधी चौक, सुभाष चौक, शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, श्रीरामपूर परिसर आदी ठिकाणी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार, मुख्याधिकारी निर्मल राशिनकर, शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम, वसंतनगरचे प्रदिपसिंह परदेशी, वाहतूक शाखेचे ब्रिजपालसिंग ठाकूर, नगरपरिषदेचे अधिकारी अविनाश अर्धापूरकर, प्रशांत देशमुख, धर्मेंद्र ठाकूर, राजेश पवार आदींनी कारवाईची धडक मोहीम तीव्र केली.
शहरातील मास्क न लावलेले व विनाकारण डबल सिट भटकणाऱ्या जवळपास १०० जणांविरुद्घ कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे जवळपास २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
दुकानदारांवरही कारवाई
येथील एका किराणा दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने त्यांना दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. मोहिमेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी याच पथकाने नियम न पाळणाऱ्या ८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन तब्बल ५६ हजार ६०० रुपये एवढा दंड वसूल केला होता. ही मोहीम यापुढे दररोज सुरु राहणार असून नागरिकांनी लॉकडाऊन नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी केले आहे.
रेड झोनमुळे कठोर उपाययोजना
केंद्र सरकारने जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये केला आहे. त्यामुळे प्रशासन व पोलिसांतर्फे कठोर उपाययोजना राबविल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाºया दुकानदारांवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे.