साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांशी जीवघेणा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:25 IST2018-01-20T23:25:17+5:302018-01-20T23:25:27+5:30
सहकारी तत्वावरील साखर कारखाने बंद पडल्याने खाजगी व्यवस्थापनाचे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. तोंड पाहून उसाची तोड होत असल्याने अनेकांच्या शेतात ऊस उभा आहे.

साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांशी जीवघेणा खेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : सहकारी तत्वावरील साखर कारखाने बंद पडल्याने खाजगी व्यवस्थापनाचे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. तोंड पाहून उसाची तोड होत असल्याने अनेकांच्या शेतात ऊस उभा आहे. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी रडकुंडीला आले आहे.
महागाव, उमरखेड तालुक्यातील दोन सहकारी साखर कारखाने बंद झाले. गुंज येथील साखर कारखाना खाजगी व्यवस्थापनाला विकण्यात आला तर वसंतची त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. दोन्ही तालुक्यात सुपिक जमीन आणि मुबलक पाणी आहे. त्यामुळे याभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. परंतु राजकारण्यांनी दोन्ही कारखान्याची वाट लावली. आता गुंज येथील साखर कारखाना नॅचरल शुगरने विकत घेतला आहे. त्यातच यंदा ऊस पळविण्याची स्पर्धा दिसत नाही.
खाजगी कारखाना रिकव्हरी देणाऱ्या फडाला हात लावत आहे. पावणे दोन लाख मेट्रीक टन गाळप नॅचरल शुगरने केले आहे. कारखान्याची रिकव्हरी ११.८० आहे. रिकव्हरी लपविल्या जात असल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. रिकव्हरी तपासण्यासाठी साखर आयुक्तांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांचा ऊस तोडण्याची आवश्यकता आहे. मात्र महागाव आणि पुसद तालुक्यात ऊसतोड टोळ्यात फिरताना दिसत नाही.
पिळवणूक होऊनही सर्वच गप्प
महागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खासगी कारखाने पिळवणूक करीत आहे. मात्र या कारखान्याच्याविरुद्ध कुणीही बोलायला तयार नाही. शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांना दिलासा दिला जात नाही. सर्व लोकप्रतिनिधी मात्र गप्प असल्याचे दिसून येते.