पाण्यासाठी पैनगंगा नदी पात्रातच उपोषण
By Admin | Updated: January 8, 2015 23:03 IST2015-01-08T23:03:10+5:302015-01-08T23:03:10+5:30
हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे, या मागणीसाठी विदर्भ-मराठवाड्यातील

पाण्यासाठी पैनगंगा नदी पात्रातच उपोषण
उमरखेड (कुपटी) : हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे, या मागणीसाठी विदर्भ-मराठवाड्यातील ५० नागरिकांनी भोजनगर तांड्याजवळ पैनगंगेच्या नदीपात्रातच उपोषणाला प्रारंभ केला आहे.
अल्प पावसाने यंदा उमरखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पैनगंगा नदी तर हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी अल्प विसर्ग करण्यात आला. परंतु पाणी चातारी, बोरीपर्यंतच पोहोचले. पुढील गावांमध्ये मात्र पाणीच पोहोचले नाही. त्यामुळे या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह जनावरांसुद्धा भटकंती करावी लागत आहे. अनेक गावच्या नळयोजना ठप्प पडल्या आहे. इसापूर धरणातून सोडलेले पाणी वरच्या गावातील मंडळी अडवून ठेवतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे अनेक गावांना पाणीच मिळत नाही.
इसापूर धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे, अशी मागणी करीत ६ जानेवारीपासून भोजनगर तांड्याजवह ५० नागरिक उपोषणाला बसले आहे. त्यात संजय देवकते, रतन राठोड, कैलास राठोड, युवराज राठोड, सुरेश पवार, संदीप राठोड आदींचा समावेश आहे. या उपोषणाबाबत जिल्हाधिकारी, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता आणि पोलीस खात्यालाही कळविण्यात आले आहे. परंतु दोन दिवसांपासून या उपोषणाची कुणीही दखल घेतली नाही. पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)