शेतकऱ्यांनी बैलजोडी काढली विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:42 IST2018-05-10T22:42:54+5:302018-05-10T22:42:54+5:30
सततची नापिकी आणि यावर्षीच्या वैरणटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विक्रीस काढली आहे. वैरणासोबत यंदा पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-रार्जाची जोडी विकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीे.

शेतकऱ्यांनी बैलजोडी काढली विक्रीला
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : सततची नापिकी आणि यावर्षीच्या वैरणटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विक्रीस काढली आहे. वैरणासोबत यंदा पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-रार्जाची जोडी विकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीे.
उमरखेड तालुका विदर्भाच्या टोकावर आहे. तालुक्यापासून मराठवाडा सीमा नजीक आहे. भौगोलिकदृष्ट्या हा तालुका व्यापक आहे. तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. त्यामुळे हा तालुका सुपिक म्हणून गणला जातो. मात्र यंदा पैनगंगा कोरडी पडली आहे. त्यातच सततच्या नापिकीमुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. पावसाअभावी नेमके कोणते पीक घ्यावे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. ही सर्व मदार बैलजोडीवर अवलंबून असते. बैलजोडीशिवाय शेत कसणे शक्यच नाही. मशागत त्यांच्याच भरवशावर केली जाते. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई आणि वैरणटंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. बळीराजाला तसेही दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आपत्तीला तोंड द्यावेच लागत आहे. त्यात यंद बैरणटंचाई निर्माण झाल्याने नाईलाजास्तव त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली बैलजोडी विक्रीस काढावी लागत आहे. बैलजोडीसोबतच पाळीव जनावरे विकण्याची वेळ पशुपालकांवर ओढवली आहे. सध्या तालुक्यातील बैलबाजारात मोठ्या प्रमाणात बैलजोडी विक्रीस येत आहे.
खरिपानंतर रबीतही पावसाचा फटका
गेल्या खरीप हंगामानंतर रबीचा हंगामही अत्यल्प पावसातच गेला. त्यामुळे मुक्या जनांवराच्या पाण्यासह वैरणाचा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे. स्वत: हालअपेष्टा भोगात आत्तापर्यंत अनेकांनी बैलजोडी आणि इतर पाळीव जनावरे पोसली. मात्र यावर्षीच्या उन्हाळ्यातील पाणी आणि वैरणटंचाईमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सतत संकटे येत असल्याने बळीराजा पुरता खचला आहे.