शेतकरी आत्महत्या आणि कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव

By Admin | Updated: January 11, 2015 22:56 IST2015-01-11T22:56:48+5:302015-01-11T22:56:48+5:30

कापसाचा शोध लावणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याची ख्याती संपूर्ण जगात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दीची पहाट यावी म्हणून कुठल्याच

Farmers' Suicides and Funerals of Employees | शेतकरी आत्महत्या आणि कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव

शेतकरी आत्महत्या आणि कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव

यवतमाळ : कापसाचा शोध लावणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याची ख्याती संपूर्ण जगात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दीची पहाट यावी म्हणून कुठल्याच उपाययोजना होतांना दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. यंदा तर सुगीच्या दिवसांमध्ये आत्महत्या होत असल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे. अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा झाला. महसूल प्रशासनासारखा महोत्सव रद्द करण्याचे धाडस त्यांना दाखविता आले नाही. सामाजिक संवेदना जिवंत असल्याचेही सांगायचे अन् आपली सांस्कृतिक हौसही भागवायची असा हा ‘डिप्लोमॅटिक’ प्रकार होता. दुष्काळग्रस्तांना मदतच करायची होती तर कार्यालये ओस पाडून महोत्सवाचे आयोजन करण्याची गरज नव्हती.
आत्महत्या म्हणजेच शेतकरी असे समीकरण रूढ होवू लागले आहे. आत्महत्या या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून शेतकरी हा शब्द वापरला गेला तर त्यात नवल वाटण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांचे हे दु:ख पाहून अनेक जणांना त्यांचा कळवळा येतो. त्यामुळे काही जणांच्या प्रासंगिक संवेदना जागृत होतात. कुणी भाषणातून तर कुणी आपल्या पतसंस्थेतून या संवेदना जगजाहीर करीत असतात. त्यानंतर होणारे फोटोसेशन अथवा वृत्तपत्रांना पुरविल्या जाणाऱ्या बातम्या यातून ही कळवळ्याची नाती लोकांना माहीत होते. आम्ही दु:खालाही प्रासंगिक कराराप्रमाणे घेत असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असे असले तरी आम्हाला प्रशासन व राजकारण सांभाळत सामाजिक संवेदना जिवंत असल्याचा पुरावा देण्याची हौस असतेच असते.
अशीच हौस भागविण्याचा प्रकार नुकताच पुढे आला. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी संघाच्या वतीने गुलाबी थंडीच्या साक्षीने शिक्षकांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे आम्ही मन मारून हा महोत्सव घेत असल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी संघाकडून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे. या प्रयत्नाचे खरंच कौतुक केले पाहिजे. उद्घाटन सोहळ्यावर जादा खर्च न करता तो निधी दुष्काळग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक खेळाडूंना जेवणही देण्यात येणार नाही. व्यावसायीक कलावंतांच्या कार्यक्रमावर खर्च करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांचेच सांस्कृ तिक कार्यक्रम आयोजित करून खर्चाला कात्री लावण्यात येणार आहे. काही का असेना शेतकऱ्यांच्या दु:खाने व्याकुळ झालेल्या मनांना आपल्यातील कलावंत जिवंत असल्याचा पुरावा देण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. कुठलाही विशेष सराव न करता आपले कौशल्य पणाला लावणे काही सोपे नसते. ही संधी या निमित्ताने कर्मचाऱ्यांना चालून आली आहे. त्या संधीचे सोने होतांना पाहून जिल्हा परिषदेची मान निश्चितच गर्वाने उंचावत असेल.
या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सामाजिक किनार होती. पारंपरिक पध्दतीला फाटा देत रक्तदानाने उद्घाटन करण्यात आले. त्यातही एका अंध कर्मचाऱ्याने रक्तदान करून आपले सामाजिक भान सिध्द केले. जिल्ह्याचा विविध पंचायत समितीमधील तब्बल सोळाशे खेळाडूंच्या सूप्त सांस्कृतिक व क्रीडामूल्यांचा हा आनंदोत्सव आहे. मात्र हा आनंद साजरा करतांना त्यांनी बेभान न होता आपले सामाजिक भानही जपले आहे. यासाठी ेकर्मचाऱ्यांनी आपला हिस्सा दिला आहे. मात्र जादा उधळपट्टी न करता उरली तर काही रक्कम दुष्काळग्रस्तांना पाठविली जाणार आहे. अकालग्रस्तांचे फाटलेले काळीज शिवण्याचा हा प्रयत्न आहे.
यापूर्वी महसूल प्रशासनाने आपला महोत्सव रद्द करून ती रक्क म दुष्काळग्रस्तांना पाठविण्याचा संवेदनशिल निर्णय घेतला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने पुढाकार घेतला. मात्र महसूल प्रशासनासारखा महोत्सव रद्द करण्याचे धाडस त्यांना दाखविता आले नाही. सामाजिक संवेदना जिवंत असल्याचेही सांगायचे अन् आपली सांस्कृतिक हौसही भागवायची असा प्रकार होता. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Farmers' Suicides and Funerals of Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.