खान्देशातील शेतकऱ्याने फुलविली तिवसा येथे शेती
By Admin | Updated: December 21, 2015 02:40 IST2015-12-21T02:40:12+5:302015-12-21T02:40:12+5:30
शेतकरी आत्महत्येमुळे यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशात संवेदनशील झाला आहे. या भागातील तरूण पिढी शेतीपासून दूर जात आहे.

खान्देशातील शेतकऱ्याने फुलविली तिवसा येथे शेती
टरबूज लागवडीचा प्रयोग : ३०० टन उत्पादन, २० एकरात सौर फेन्सिंग, मल्चिंग पेपरचा वापर
रूपेश उत्तरवार यवतमाळ
शेतकरी आत्महत्येमुळे यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशात संवेदनशील झाला आहे. या भागातील तरूण पिढी शेतीपासून दूर जात आहे. या स्थितीत खान्देशातील शेतकऱ्याने माळरानावर हिरवी चादर फुलविली आहे. २० एकरात टरबूज आणि खरबुजाची लागवड केली आहे. हे पीक काढणीला आले आहे. ३०० टन उत्पादनाची शक्यता आहे. या शेतकऱ्याला २४ लाख रूपयांचे टरबूज होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. माळरानावर शेती यशस्वी केली आहे. इच्छाशक्ती असेल तर कुठलीच बाब अशक्य नसल्याचे खान्देशातील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.
यवतमाळ-दारव्हा मार्गावर १८ किलोमीटर अंतरावर तिवसा गाव आहे. या ठिकाणी संपूर्ण माळरान ओसाड आणि रखरखले आहे. काही किलोमीटरपर्यंत पाण्याचा थेंबही नाही. अशा विपरित परिस्थितीवर मात करीत खान्देशातील अनिल चौधरी या शेतकऱ्याने चंद्रकांत गणेडीवाल यांच्या शेतातील २० एकरात टरबूज आणि खरबुजाची शेती फुलवली आहे.
या माळरानालगतचा संपूर्ण परिसर ओसाड पडला आहे. या ठिकाणी पाण्याचा थेंबही नाही. याकरिता त्यांनी एक किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन आणली आहे. शेतशिवारात सिंचनाची व्यवस्था केली आहे. कमी पाण्यात अधिक ओलित करता यावे म्हणून ठिबक सिंचनाचा वापर त्यांनी केला आहे. ओसाड माळरानाच्या दगडावर ही शेती फुलविण्यात आली आहे. सरीवरंबा पद्धतीने टरबूज आणि खरबुजाची लागवड त्यांनी केली आहे. धरणाचा गाळ आणि माती टाकून त्यांनी बियाणे लावले. यासाठी चौधरी यांना राजेश राठोड हा तरुण मदत करतोय.
संपूर्ण २० एकर परिसराला नियंत्रित करण्यासाठी ८ वॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. या ठिकाणावरून पाण्याचे नियंत्रण करण्यात आले आहे. खताचे व्यवस्थापन या माध्यमातून करण्यात आले आहे. जंगली प्राण्यापासून संरक्षण मिळावे म्हणून तार कम्पाउंड करण्यात आले आहे. त्याला सौरउर्जेच्या विजेने तारकुंपणाला संरक्षित करण्यात आले आहे. माळरानावरील लाल मातीत टरबुजाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ८० हजार रोप त्यांनी लावले आहे. एका झाडाला तीन टरबूज याप्रमाणे ८० हजार रोपांपासून ३०० टन टरबूज निघण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या दरानुसार यातून २४ लाख रूपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यासोबतच अंतरपीक म्हणून सुबाभळीची लागवड केली आहे. २० एकरात ४० हजार सुबाभळीचे झाडे लावली आहेत. त्यासाठी कंपनीशी करारही करण्यात आला आहे.