२१९४ मॉ दुर्गांची स्थापना
By Admin | Updated: October 2, 2016 00:17 IST2016-10-02T00:17:07+5:302016-10-02T00:17:07+5:30
जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली.

२१९४ मॉ दुर्गांची स्थापना
उत्सव : १४ ठिकाणे संवेदनशील, २६४ शारदादेवी विराजमान
यवतमाळ : जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली. तसेच २६४ शारदा मंडळांनीही मॉ शारदेची स्थापना केली. सर्वत्र उत्सवाचे वातावरण असून जिल्हा मुख्यालयी जय अंबेच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. यात पावसांच्या सरींनी वेगळीच रंगत भरली. मातेचे भक्त ढोलताशाच्या तालावर थिरकताना दिसत होते.
पोलीस दप्तरी नोंद झालेल्या दोन हजार १९४ दुर्गा मंडळांनी पहिल्याच दिवशी मातेची स्थापना केली. यामध्ये शहरी भागातील ६२६ तर ग्रामीण भागातील एक हजार ५६८ दुर्गोत्सव मंडळ आहे. ४५८ गावांनी आदर्शाची परंपरा जोपासत ‘एक गाव एक दुर्गा’ या प्रमाणे स्थापना केली आहे. दुर्गोत्सवाप्रमाणेच शारदा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. २६४ मंडळांनी माँ शारदेची स्थापना केली आहे. यातील ४२ मंडळ शहरी भागातील असून ग्रामीण भागात २२२ मंडळे आहेत. एक गाव एक शारदा हा आदर्श १२२ मंडळांनी जोपासला आहे. भावपूर्ण वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणपती विसर्जनादरम्यान उमरखेड येथे झालेल्या घटनेनंतर संपूर्ण यंत्रणेलाच सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दुर्गोत्सवाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याची सतर्कता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
ही आहेत जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे
यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, घाटंजी, पुसद, उमरखेड, महागाव ही शहरी भागातील संवेदनशील ठिकाणे आहेत. ग्रामीण भागातील संवेदनशील ठिकाणामध्ये यवतमाळ तालुक्यातील रूईवाई, सावर, दिग्रसमधील कलगाव, महागाव येथील फुलसावंगी, खंडाळा येथील शेंबाळपिंपरी, पुसदमधील काळी दौ., जांबबाजार, वनवार्ला, धनसळ, बीटरगाव येथील ढाणकी, पोफाळी येथील मुळावा, उमरखेड येथील विडूळ, वडकी येथील खैरी, पारवा येथील कुर्ली, सदोबासावळी, वडगाव जंगल येथील अकोलाबाजार, येळाबारा, मेटीखेडा, शिरपूर येथील पुनवट, आर्णी येथील डेहणी, पाटण या ग्रामीण भागांचा संवेदनशील ठिकाणे म्हणून पोलिसात नोंद आहे. येथे विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दुर्गोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त
दुर्गोत्सवात शांतता कायम राखण्यासाठी जिल्ह्यात २१०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. ७०० होमगार्ड, एक एसआरपीएफची कंपनी, ६७ सहायक निरीक्षक व फौजदार, २९ पोलीस निरीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी आणि या सर्वांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे.