दुष्काळातही शेतकऱ्यांच्या बँकेत उधळपट्टी
By Admin | Updated: May 13, 2016 02:40 IST2016-05-13T02:40:40+5:302016-05-13T02:40:40+5:30
शेतकऱ्यांची हक्काची बँक असा बिरुद लावणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भीषण दुष्काळी परिस्थितीतही मोठ्या प्रमाणात उधळपट्टी सुरू आहे.

दुष्काळातही शेतकऱ्यांच्या बँकेत उधळपट्टी
राजेश निस्ताने यवतमाळ
शेतकऱ्यांची हक्काची बँक असा बिरुद लावणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भीषण दुष्काळी परिस्थितीतही मोठ्या प्रमाणात उधळपट्टी सुरू आहे. एकीकडे पैसा नाही म्हणून शेतकऱ्यांचे पीककर्ज वाटप थांबले आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्याच या बँकेच्या तिजोरीतून संचालक-व्यवस्थापनाने वर्षभरात चहापान-वाहन आणि भत्त्यांवर तब्बल ३ कोटी ७२ लाख २० हजार ३४४ रुपयांचा वारेमाप खर्च केल्याची गंभीरबाब उघडकीस आली आहे.
राष्ट्रीयकृत बँका दारात उभ्या करीत नाही, म्हणून शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आशाळभूत नजरेने पाहतो. हीच आपली हक्काची बँक असल्याचे तो मानतो. या बँकेची यंत्रणाही जिल्हा मध्यवर्ती ही शेतकऱ्यांची बँक असल्याचे छातीठोकपणे सांगतो. परंतु शेतकऱ्यांच्या या बँकेत शेतकरीच उपेक्षित आहे. या उलट बँकेचे अधिकारी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची बँकेच्या पैशातून मौज सुरू आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्ज वाटपासाठी पैसा नाही, या बँकेने राज्य बँकेला ३०० कोटी कर्ज मागितले आहे. अद्याप ते मंजूर न झाल्याने शुक्रवार ६ मेपासून जिल्ह्यातील ९१ पैकी बहुतांश शाखांमध्ये कर्ज वाटप बंद झाले आहे. किमान आठवडाभर हे वाटप बंद राहण्याची शक्यता खुद्द बँकेच्या व्यवस्थापनाने बोलून दाखविली आहे. पैशाची चणचण असतानाही जिल्हा बँकेत खर्चासाठी मात्र अधिकारी आणि संचालकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र नाही. उलट मिळेल त्या मार्गाने उधळपट्टी सुरू आहे.
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या वर्षभरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय आणि यवतमाळ, वणी, पांढरकवडा, दारव्हा, पुसद या पाच विभागीय कार्यालयाचा चहापान, वाहन व भत्त्यांवरील खर्च तब्बल तीन कोटी ७२ लाख २० हजार ३४४ रुपये नोंदविण्यात आला. त्यात चहापानावर २१ लाख १५ हजार, वाहनांवर एक कोटी ४७ लाख तर भत्त्यांवरील १७ लाख ५५ हजारांच्या खर्चाचा समावेश आहे. बँकेच्या व्यवस्थापन-प्रशासनाचे प्रमुख अधिकारी आणि संचालकांचे सर्वाधिक काळ वास्तव्य राहणाऱ्या यवतमाळातील पाचकंदील चौक स्थित एकट्या मुख्यालयाचा वार्षिक खर्च तब्बल १ कोटी २५ लाख ३५ हजार १३२ रुपये एवढा प्रचंड आहे. त्यात केवळ चहापानावर १५ लाख ५२ हजार रुपये खर्च केले गेले. वाहनांवर तब्बल ९४ लाख तर अधिकारी-संचालकांच्या भत्त्यांवर १५ लाख ५७ हजारांचा खर्च दाखविला गेला आहे.
चहापान, वाहन व भत्त्यावरील खर्चात वणी विभागाची आघाडी आहे. तेथील खर्च तब्बल १६ लाख ५१ हजार एवढा आहे. त्या पाठोपाठ यवतमाळ, दारव्हा, पुसदचा क्रमांक आहे. सर्वात कमी सात लाखांचा खर्च हा पांढरकवडा विभागाचा आहे.
पार्ट्या-डबे-ड्रायफ्रूट आणि ज्यूसची रेलचेल
जिल्हा बँकेच्या यवतमाळ मुख्यालयात चालणारी उधळपट्टी सर्वश्रृत आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळणे दुरापास्त असताना राजकीय कार्यकर्त्यांना मात्र ज्यूस पाजून खूश केले जाते. बँकेत चालणाऱ्या पार्ट्या, रंगणारे डाव, खास मेन्यूचे सावजीकडून येणारे डबे, उशिरापर्यंतची कार्यकर्त्यांची चेंबरमधील वर्दळ याची बँकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. बँकेच्या पैशातून घरी आलेल्या पाहुण्यांसाठी नास्ता, ड्रायफ्रूट नेण्याचे प्रकारही होत असल्याची चर्चा कनिष्ठ यंत्रणेतून ऐकायला मिळते. वाहनांवरील खर्चही असाच मनमानीपद्धतीने केला जात आहे. खासगी कामासाठी बँकेच्या पैशातून भाड्याने वाहने नेली जातात. स्वत:च्या मालकीच्या गाड्या मात्र घरी उभ्या ठेवल्या जातात. बँकेतील या उधळपट्टीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.