लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात यंदाही अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात आली. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे सुरुवातीला महाविद्यालय स्तरावरून विद्यार्थ्यांना लिंक पाठवून ऑनलाइन अर्ज मागविले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या अकरावीच्या सर्व जागा भरल्या असून अद्यापही उरलेल्या काही विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.यंदा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेतून एकंदर ३६ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्यासाठी अकरावीच्या विज्ञान, कला, वाणिज्य शाखांच्या तब्बल ३९ हजार ७६० जागा उपलब्ध आहेत. शिवाय एमसीव्हीसीच्याही अडीच हजार जागा आहेत. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही.प्रत्यक्षात जिल्ह्यात ११ वीचे वर्गही सुरू करण्यात आले आहे. शहरी भागातील महाविद्यालयांची जेवढी मंजूर ‘इनटेक कॅपेसिटी’ आहे, तेवढे विद्यार्थी प्रवेशित झाले आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांची देखील परिस्थिती अशीच आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये मंजूर जागांपेक्षा कमी प्रवेश झाल्याचे वास्तव आहे. मात्र यंदाच्या प्रवेश संख्येबाबत अद्याप शिक्षण विभागाने प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही. ती झाल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
शिक्षक संख्येवर परिणाम नाहीजिल्ह्यात अकरावीच्या तुकड्या असलेले ३२२ महाविद्यालये आहेत. मात्र, सर्वच महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे संचमान्यतेचा प्रश्न निर्माण होऊन शिक्षक संख्या कमी होण्याची शक्यता नसल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
मागील वर्षाची स्थितीयंदाप्रमाणेच मागील वर्षीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागा अधिक होत्या. यंदा संपूर्ण जागा भरल्या असून काही दिवसांपूर्वी ज्यांनी आयटीआयला अर्ज टाकला मात्र आता आयटीआयला नंबर लागला नाही, असे विद्यार्थी आता अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनाही प्रवेश दिला जात आहे.