अकरावीच्या आठ हजार जागा रिक्त राहणार
By Admin | Updated: June 16, 2016 02:46 IST2016-06-16T02:46:31+5:302016-06-16T02:46:31+5:30
दरवर्षी अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा मात्र तशी वेळच येणार नाही.

अकरावीच्या आठ हजार जागा रिक्त राहणार
चार महाविद्यालयांवर गंडांतर : क्षमता ४० हजार, उत्तीर्ण ३२ हजार
रूपेश उत्तरवार यवतमाळ
दरवर्षी अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा मात्र तशी वेळच येणार नाही. जिल्ह्यात ३२ हजार विद्यार्थी दहावी पास झाले असून ३४२ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ४० हजार आहे. त्यामुळे आठ हजार जागा रिक्त राहणार असून या रिक्त जागा भरण्यासाठी आता महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. तर काही नामांकित महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांचा अट्टाहास जिल्ह्यात सुरू आहे.
जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केले. बुधवार १५ जूनपासून प्रवेश अर्जाची विक्री सुरू झाली. १८ जूनपर्यंत अकरावीचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर छाननी होऊन गुणवत्ता यादी जाहीर होईल. संवर्गनिहाय प्रवेश दिला जाणार आहे. दरवर्षी ११ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू असते. यावर्षी जिल्ह्यात चित्र उलटे आहे. दहावीची परीक्षा ३२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर प्रवेश क्षमता ४० हजार ६४० एवढी आहे. त्यामुळे आठ हजार विद्यार्थ्यांअभावी स्वयंअर्थसहाय्य महाविद्यालयांवर गडांतर येणार आहे. तर चार कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. यात पाटण, मांडवी, यवतमाळ आणि उमरखेड येथील महाविद्यालयाचा समावेश आहे.