दोन साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न
By Admin | Updated: August 26, 2014 23:44 IST2014-08-26T23:44:18+5:302014-08-26T23:44:18+5:30
अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा

दोन साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न
अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव : थकीत कर्जाबाबत निर्णय होणार
मुकेश इंगोले - दारव्हा
अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय येणे आणि थकीत कर्जाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना आणि महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. आर्थिक डबघाईस आलेले हे दोन्ही कारखाने अवसायनात येऊन बंद पडले. त्यानंतर दोन्ही कारखाने भाडे तत्त्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला. वारणा समूहाने दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर घेतले. मात्र करार मोडीत काढत कारखाना बंद केला. त्यामुळे जयकिसान सहकारी साखर कारखाना २०१० पासून बंद आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दोन जिल्हे आणि सहा तालुके आहेत. दोन्ही कारखाने बंद असल्याने या भागातील ऊस उत्पादक कामगार, कर्मचारी देशोधडीला लागले आहे. कारखान्याची मालमत्ताही चोरीस जात आहे. अशा स्थितीत सदर कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. विदर्भातील सहकारी साखार कारखाने सुरू करण्याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह या विभागातील नेते व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, आमदार विनय कोरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक उपस्थित होते.
या बैठकीत दोन्ही कारखाने भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याकडे असलेले शासकीय रकमांची वसुली लांबणीवर टाकण्यात आली. शासन थकहमीवरील कर्जाच्या परतफेडी बाबत वित्तीय संस्थांच्या स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात यावा. तसेच थकहमी शिवाय असलेल्या कर्जाबाबत वित्तीय संस्थांशी विचार विनिमय करण्याबाबत या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीनंतर साखर आयुक्तांनी कारखान्याच्या अवसायकांशी चर्चा केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. जयकिसान साखर कारखाना सुरू करण्यासाठी अॅड़ शंकरराव राठोड, वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, शामराव देशमुख, पंढरीनाथ सिंह, सुभाष राठोड यांनी पुढाकार घेतला आहे.