अवकाळी पावसाने रबीचा गहू, चणा आडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST2021-02-19T05:00:00+5:302021-02-19T05:00:07+5:30
जिल्ह्यात एक लाख ८६ हजार हेक्टरवर यावर्षी रबीची पेरणी झाली. यातील हरभराचे पीक काढणीला आले आहे. काढणीच्या सुमारासच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हरभरा पिकाचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे काढणीला आलेला गहू वादळ वाऱ्यामुळे आडवा पडला आहे. यातून गव्हाची गुणवत्ता खराब होण्याचीही शक्यता आहे.

अवकाळी पावसाने रबीचा गहू, चणा आडवा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुरुवारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसल्याने रबी हंगामातील गहू, चणा या पिकांचे नुकसान झाले आहे. दारव्हा, नेर, महागाव, घाटंजी, आर्णी, पांढरकवडासह सर्वच तालुक्यांना तडाखा बसला. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने शुक्रवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात एक लाख ८६ हजार हेक्टरवर यावर्षी रबीची पेरणी झाली. यातील हरभराचे पीक काढणीला आले आहे. काढणीच्या सुमारासच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हरभरा पिकाचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे काढणीला आलेला गहू वादळ वाऱ्यामुळे आडवा पडला आहे. यातून गव्हाची गुणवत्ता खराब होण्याचीही शक्यता आहे. रबीचे पीक हातात येत असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
असा बरसला पाऊस
जिल्ह्यात गत २४ तासात ८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ५० मिमी पाऊस नेरमध्ये बरसला आहे. यवतमाळमध्ये २.९ मिमी, बाभूळगाव तालुक्यामध्ये १.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कळंब तालुक्यात १४ मिमी पाऊस पडला. आर्णी तालुक्यात २३ मिमी पाऊस झाला. महागाव तालुक्यात १६ मिमी पावसाची नोंद झाली. घाटंजी तालुक्यात ३३ मिमी पाऊस झाला. आणखी दोन दिवस पावसाचे सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.