दिग्रस तालुक्याला दुष्काळातून डावलल्याने रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:39 IST2018-10-30T22:38:50+5:302018-10-30T22:39:36+5:30

राज्य शासनाने प्रचंड अभ्यास केल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती घोषित केली. मात्र दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करताना दिग्रस तालुका वगळण्यात आला. या उपेक्षेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील नागरिक संतापले आहे.

Due to the deterioration of Digras taluka, due to drought | दिग्रस तालुक्याला दुष्काळातून डावलल्याने रोष

दिग्रस तालुक्याला दुष्काळातून डावलल्याने रोष

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : राज्य शासनाने प्रचंड अभ्यास केल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती घोषित केली. मात्र दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करताना दिग्रस तालुका वगळण्यात आला. या उपेक्षेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील नागरिक संतापले आहे. दुष्काळी यादीमध्ये दिग्रसचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
शासनाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्येच दुष्काळ सदृश स्थिती जाहीर करीत इतर तालुक्यांवर अन्याय केला आहे. दुष्काळाची झळ सर्व १६ ही तालुक्यांना सारखीच बसत आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, असे निवेदन शिवसेनेतर्फे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. बाभूळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड, केळापूर आणि यवतमाळ या तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. वास्तविक यंदा संपूर्ण जिल्ह्यातच पावसाची अनियमितता होती. पावसात खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट झाली आहे. असे असतानाही दुष्काळी यादीत दिग्रसला स्थान दिले गेले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली आहे.
१६ ही तालुक्यांमध्ये सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर मधल्या काळात बराच खंड पडला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी, नागरिकांना दुष्काळी सवलतींचा लाभ देण्यात यावा, अशी भूमिका महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही घेतली आहे. शिवसेनेच्या दिग्रस शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्यावतीने याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, शहर प्रमुख संजय कुकडी, नगरसेवक डॉ. संदीप दुधे, नगरसेवक केतन रत्नपारखी, राहूल गाडे, संदीप रत्नपारखी, नगरसेवक बाळू जाधव, अजय भोयर, रमाकांत काळे, शेखर चांदेकर, गोपाल राठोड, नितीन सोनुलकर, चेतन श्रीवास, ललित राठोड, कैलास तायडे, अमोल राठोड आदी उपस्थित होते.
सोयाबीन, कापसात घट
दिग्रस तालुक्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकत्याच निघालेल्या सोयाबीनचा उताराही कमी आहे. दाणा परिपक्व नसल्याने योग्य भावही मिळणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी कापसाची प्रतवारीसुद्धा घसरली आहे.

Web Title: Due to the deterioration of Digras taluka, due to drought

टॅग्स :Farmerशेतकरी