दुष्काळाने मरण झाले स्वस्त

By Admin | Updated: December 21, 2014 23:07 IST2014-12-21T23:07:58+5:302014-12-21T23:07:58+5:30

यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ‘जाऊ तेथे खाऊ’, या मराठी चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या

Drought got cheap | दुष्काळाने मरण झाले स्वस्त

दुष्काळाने मरण झाले स्वस्त

पीक हातचे गेले : पाणी नाही, पीक नाही अन् पैशाचेही वांदे, बळीराजाची शोकांतिका
गणेश रांगणकर - नांदेपेरा
यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ‘जाऊ तेथे खाऊ’, या मराठी चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांचे मार्मिक वर्णन केले आहे़ ते यावर्षी शेतकऱ्यांना तंतोतंत लागू पडत आहे.
सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत़ त्यांचे सारे काही उधार, उसणवारीवर चालते. पेरणीसाठी लागणारा पैसा कुठून आणला, असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला असता अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतल्याचे सांगितले़ काही शेतकऱ्यांनी बचत गट, सोसायटीकडून कर्ज घेतल्याचे सांगितले़ पेरणीच्या चाड्यावर मूठ ठेवण्यापासून ते पीक घरात येईपर्यंत, शेतकऱ्यांना जागोजागी पैसाच मोजावा लागतो़ त्यामुळे शेवटपर्यंत त्यांचा खर्च व उत्पन्न यांचा हिशेबच जुळत नाही़
पीक हाती येताच उधार, उसणवारी फेडण्यात शेतकऱ्यांची दमछाक होते. यावर्षी तर पिकानेही चांगलाच दगा दिला. कपाशी, सोयाबिनची उतारी अत्यंत कमी आली. त्यातच बाजारात शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. त्यातूनच शेतकरी गळ्याभोवती फास अथवा विष प्राशन करीत असल्याने त्यांचे कुटूंब उघड्यावर पडत आहे़ घराचा आधारच गेल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो़
भारत हा कृषी प्रधान देश म्हणविणाऱ्या शेतकऱ्यांच्या मरणानंतर त्यांच्या कुटुंबाकडे कुणी फिरकूनही बघत नाही़ एवढेच नव्हे तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मृत्यू पश्चात सरकारी मदतीसाठी पात्र, अपात्रतेच्या कसोटीला सामोरे जावे लागते. अथक परिश्रम घेऊन शेतकरी काळ्या आईची ओटी भरतो. परंतु पदी निराशाच पडते. यावर्षी खरीप, रबी हंगाम वाया गेल्याने पुढचा-मागचा हिशेब जुळायलाच तयार नाही़ शेतकऱ्यांचा डोक्यावरील खर्चाचा भार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे़ त्यामुळे शेकरी पुन्हा कर्जबाजारी होत आहे़
दुष्काळाची लागलेली ‘दृष्ट’ पुसून शेतकरी जोमाने उभा राहण्यासाठी धडपडतो आहे. मात्र अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटही त्यांच्यासमोर आ वासून उभे आहे़ काही मोजके शेतकरी शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याने या व्यवसायातही आता घट होत आहे. त्यामुळे हा पूरक व्यवसायही मोडीत काढण्याची वेळ बळीराजावर ओढवली आहे़

Web Title: Drought got cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.