अवकाळी पावसाने थंडावला दिवाळीचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 06:23 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T06:23:33+5:30
लक्ष्मीपूजनानंतरही गायगोधन, भाऊबिजेपर्यंत दिवाळीची बाजारपेठे तेज असते. यंदा मात्र सोमवारी यवतमाळातील मेनलाईन चक्क सकाळी ११ वाजतापर्यंत बंद असल्यासारखी स्थिती होती. त्यानंतर दुकाने उघडली, तरी ग्राहकांची वर्दळ अत्यंत विरळ होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टेट बँक चौकात बऱ्यापैकी खरेदीसाठी झुंबड दिसली.

अवकाळी पावसाने थंडावला दिवाळीचा बाजार
अविनाश साबापुरे
यवतमाळ : जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळात पंधरा दिवस चालणारा दिवाळीचा बाजार यंदा अवघ्या एका दिवसात गुंडाळला. ऐन दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसाने बाजारपेठेवर चक्क मरगळ साचली आहे. मौसम नसताना आलेल्या पावसाने खरेदीचा मौसम तोडल्याचे दु:ख एकीकडे नोकरदारांनी व्यक्त केले, तर दुसरीकडे पावसाने शेतमजुरीतला रोजगार हिरावल्याने गावखेड्यातील खरेदीदार यवतमाळपर्यंत पोहोचलेच नाही. मध्यमवर्ग, मजूरवर्ग अशा दोन्ही ग्राहकांनी खरेदी टाळल्याने व्यापारी मात्र हताश झाले आहेत.
यवतमाळात दरवर्षी दिवाळीच्या महिनाभरापूर्वीपासून दुकानदार ‘स्टॉक’ भरतात. पंधरा दिवसांपूर्वीपासून मुख्य दुकानाच्या पुढे ‘हंगामी’ दुकान थाटून बाजार सजवितात. यंदा ऐन आॅक्टोबरच्या मध्यापासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ही ‘हंगामी’ दुकाने बाहेरच येऊ शकली नाही. त्यातही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कशीबशी दुकाने सजली. त्यामुळे रविवारचा दिवस खरेदीदारांसाठी पर्वणी ठरला. दिवसभर खरेदीसाठी झुंबड उडाली. मात्र सायंकाळ होताच पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि बाजार गुंडाळावा लागला. पावसामुळे घरी परतलेला खरेदीदार पुन्हा मार्केटकडे फिरकलाच नाही. आझाद मैदान परिसरात फटाक्यांचे मार्केट यंदा गर्दी खेचू शकले नाही. या मैदानात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होते. केवळ रविवारी दुपारी जेवढी फटाके विक्री होऊ शकली, तेवढाच विक्रेत्यांचा दिवाळीचा धंदा झाला. सोमवारी तर या विक्रेत्यांना दिसला ग्राहक की ‘या हो साहेब’ असे ओरडण्याशिवाय पर्याय नव्हता. मच्छी मार्केटसारखी ही ग्राहकांची खेचाखेची करूनही विक्रेत्यांचा धंदा होऊ शकला नाही. तर रविवारी ज्यांनी फटाके खरेदी केली, त्यांनाही मनमुराद फटाके फोडता आले नाही. रात्री आलेल्या पावसाने फटाक्यांवर एकप्रकारची बंदीच घातल्याची स्थिती होती.
लक्ष्मीपूजनानंतरही गायगोधन, भाऊबिजेपर्यंत दिवाळीची बाजारपेठे तेज असते. यंदा मात्र सोमवारी यवतमाळातील मेनलाईन चक्क सकाळी ११ वाजतापर्यंत बंद असल्यासारखी स्थिती होती. त्यानंतर दुकाने उघडली, तरी ग्राहकांची वर्दळ अत्यंत विरळ होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टेट बँक चौकात बऱ्यापैकी खरेदीसाठी झुंबड दिसली. मात्र सायंकाळपर्यंतच. जी लक्ष्मीमूर्ती दुपारी ५०० रुपयांची होती, तीच सायंकाळी ५० रुपयात विकायला दुकानदार तयार झाले. यंदा गरजेपेक्षा माल अधिक आल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. हीच स्थिती आर्णी मार्गावर पाहायला मिळाली.
लक्ष्मीपूजनासाठी बाजारात आलेली झेंडूची फुले पावसात भिजली. या फुलांकडे ग्राहकांनी ढुंकूनही पाहिले नाही. ५० रुपये किलोची फुले २० रुपये किलोनुसार द्यायला विक्रेता तयार असतानाही काही ग्राहक मात्र १० रुपयात मागण्याचा ‘पराक्रम’ करताना दिसले. त्यामुळे कंटाळलेल्या विक्रेत्यांनी फुलांची पोतीच्या पोती रस्त्यावर फेकून दिल्याचे पाहायला मिळाले. सतत बरसणाºया पावसाने यंदा गृहसजावटीच्या साहित्य खरेदीवर मोठा परिणाम जाणवला. कागदी फुले, प्लास्टिक फुले, हार आदी साहित्याला अजिबात उठाव दिसला नाही. पावसाच्या धास्तीने यंदा घरावर केली जाणारी रोषणाई मर्यादित राहिली. रंगीत दिव्यांच्या माळा, रेडीयम पट्ट्या आदींची खरेदी करण्यापेक्षा मागील वर्षीचेच जुने साहित्य वापरण्यावर भर दिसला.
दिवे मालवले, महिलांची रांगोळी पुसून गेली
लक्ष्मीपूजनासाठी गृहिणींनी खास रंगबिरंगी रांगोळीची खरेदी करून ठेवली होती. पंधरा दिवसांपासून इंटरनेटवर खास डिझाईनही शोधून ठेवल्या. रविवारी दुपारपासून मन लावून महिलांनी भव्य अशी रांगोळी अंगणात साकारली. दुसºया दिवसापर्यंत ही रांगोळी कायम ठेवण्याचा निर्धार होता. मात्र सायंकाळी आलेल्या पावसाने महिलांची कलाकुसर पार पुसून टाकली. सायंकाळी दारापुढे लावलेले दिवेही पावसामुळे तासाभरातच मालविण्याची वेळ आली. तर बच्चे कंपनीलाही फटाके फोडण्याचा नाद लवकरच आटोपता घ्यावा लागला.