सर्व आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:12 IST2018-11-18T22:11:37+5:302018-11-18T22:12:05+5:30
आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे देण्यात येईल. एकही आदिवासी यापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

सर्व आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे देण्यात येईल. एकही आदिवासी यापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित ‘बिरसा पर्व’च्या दुसऱ्या दिवशी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, माजी अध्यक्ष आरती फुफाटे, अनिल आडे, मिलिंद धुर्वे, विकास कुळसंगे, राजेंद्र मरसकोल्हे, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, बिरसा पर्व आयोजन समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, पवन आत्राम आदी उपस्थित होते.
आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेक कायदे आहे. पंडित दीनदयाल जनवन योजनेच्या माध्यमातून तारेचे कुंपण, गॅस वाटप आदी योजना सरकार राबवित आहे. या समाजातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासन करीत असून, आदिवासी आश्रमशाळांव्यतिरिक्त ही मुले आता नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे, असे ना.येरावार यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन झाले. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद घोडाम यांनी तर संचालन विनोद डवले यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.