जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८४.९२ टक्के
By Admin | Updated: June 9, 2015 01:07 IST2015-06-09T01:07:05+5:302015-06-09T01:07:05+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेत यवतमाळ

जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८४.९२ टक्के
शुभांकर धर्माधिकारी अव्वल : ४४ शाळा १०० टक्के
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेत यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा विद्यार्थी शुभांकर विवेक धर्माधिकारी ९८.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्याचा निकाल ८४.९२ टक्के लागला असून ४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेंवर दुपारपासून विद्यार्थ्यांची गर्दी दिसत होती.
दहावीच्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील ६०९ शाळांमधून ३९ हजार ७१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ७२५ म्हणजे ८४.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यासह पाच हजार ६३६, प्रथम श्रेणी १२ हजार १६, द्वितीय श्रेणीत १२ हजार ६०२ आणि तृतीय श्रेणीत तीन हजार ४७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होण्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. ८६.९० टक्के विद्यार्थिनी पास झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला २० हजार ८८८ मुले बसले होते. त्यापैकी १७ हजार ३४३ म्हणजे ८३.६ टक्के मुले उत्तीर्ण झाले. तर १८ हजार ८३६ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी १६ हजार ३८२ म्हणजे ८६.९० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.
दहावीच्या परीक्षेत लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा विद्यार्थी शुभांकर धर्माधिकारी याने ९८.४० टक्के गुण पटकाविले आहे. तो जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. दिग्रस येथील दिनबाई विद्यालयाचा विद्यार्थी चेतन जयवंत डाखोरे, पुसद येथील नवजीवन ज्ञानपीठचा पीयूष पवन जैन आणि अमेय अनिल डुबेवार या तिघांना ९८ टक्के गुण मिळाले आहे. डॉ.नंदूरकर विद्यालयाचा विद्यार्थी आकाश बाळकृष्ण जमदापुरे याला ९७.४० टक्के, अमृता अनिल मांगुळकर ९७.४०, लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा निखिल भास्कर ढोंगे ९७.२०, सेंट अलॉसेंस इंग्लिश मीडियम स्कूलची तेजस्विनी प्रशांत कोटके ९७.२०, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी अपूर्वा अमोल बढे हिला ९७.२० टक्के, अभ्यंकर कन्या शाळेची विनया विष्णू गाडेकर हिला ९६.८० टक्के, महिला विद्यालयाची आसावरी संदीप भोयर ९६.२० टक्के गुण मिळाले आहे. (नगर प्रतिनिधी)
दुर्गम झरीजामणी तालुक्याने मारली बाजी
४आदिवासी बहुल झरी तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदा घवघवीत यश मिळविले. या तालुक्याचा निकाल ८९.६६ टक्के लागला आहे. २१ शाळांमधून ९०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आदिवासी बहुल तालुक्याने पुढारलेल्या तालुक्यांना मागे टाकल्याचे दहावीच्या निकालात दिसून येते.