पाण्यासाठी संतप्त महिलांची जीवन प्राधिकरणात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:01 IST2018-03-01T22:01:24+5:302018-03-01T22:01:24+5:30
शहरात पाणीप्रश्न गंभीर झाला असून १५ दिवसानंतरही नळाला पाणी येत नसल्याने महिला संतापल्या आहे. गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी प्राधिकरणावर धडक देऊन .....

पाण्यासाठी संतप्त महिलांची जीवन प्राधिकरणात तोडफोड
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : शहरात पाणीप्रश्न गंभीर झाला असून १५ दिवसानंतरही नळाला पाणी येत नसल्याने महिला संतापल्या आहे. गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी प्राधिकरणावर धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षातील खुर्च्यांची फेकाफेक करून फाईली फाडून टाकल्या. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शहराला सध्या १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र १२ दिवस लोटूनही अनेक परिसरात नळ आले नाही. गेल्या १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देऊन संताप व्यक्त केला. नगरपरिषदेच्या माजी बांधकाम सभापती प्रणिता खडसे यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात धडक दिली. मात्र प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले मुंबईला गेल्याने महिलांचा पारा चांगलाच भडकला.
महिलांनी त्यांच्या कक्षातील खुर्च्यांची फेकाफेक केली. तेथे ठेवलेल्या अनेक फाईली फेकून दिल्या. महिलांचा रूद्रावतार बघून उपकार्यकारी अभियंता राहुल जाधव व प्राधिकरणाचे कर्मचाºयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या महिला कुणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर उपकार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत नळ येणार असल्याची ग्वाही दिल्यानंतरच महिला शांत झाल्या. महिलांनी धडक देताच पोलिसांना माहिती देण्यात आली. शहर पोलिसांचे पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलांची समजूत काढली. सायंकाळपर्यंत नळ येण्याची ग्वाही मिळाल्यानंतरच महिलांनी सुटकेचा निश्वास सोडत घर गाठले.
निळोणा, चापडोहात पाणीच नाही
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह धरणात पाणीसाठाच नसल्याचे उपकार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी सांगितले. याबाबत लोकांमध्ये जागृती का केली जात नाही, असा प्रश्न विचारला असता ते निरूत्तर झाले. त्यांनी पाण्याची इत्थंभूत माहिती नागरिकांना देण्यास प्राधिकरण कमी पडत असल्याची कबुली दिली. यापुढे शहरात आॅटोरिक्षाद्वारे पाणी सोडण्याबाबत माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले.