ग्रामीण तरुण जाताहेत व्यसनाच्या आहारी
By Admin | Updated: December 21, 2014 23:07 IST2014-12-21T23:07:16+5:302014-12-21T23:07:16+5:30
तंबाखु घोटून खाणे म्हणजेच ग्रामीण भागात व्यसन असा काहीसा समज काही वर्षापूर्वी होता. परंतु आधुनिकीकरणाने व्यसनांचे सर्व प्रकार आता ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे. गुटखा,

ग्रामीण तरुण जाताहेत व्यसनाच्या आहारी
पोफाळी : तंबाखु घोटून खाणे म्हणजेच ग्रामीण भागात व्यसन असा काहीसा समज काही वर्षापूर्वी होता. परंतु आधुनिकीकरणाने व्यसनांचे सर्व प्रकार आता ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे. गुटखा, खर्रा येथपासून देशी-विदेशी दारु सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यसनांच्या आहारी तरुणाई जात आहे. मिसरूड न फुटलेलेही सिगरेटचे झुरके मारताना दिसून येतात.
ग्रामीण भागातील तरुणाई आणि कष्टकरी असल्याचे नेहमी सांगितल्या जाते. शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन नाव कमावले आहे. परंतु आता शहरीकरणाने सर्व काही ग्रामीण भागात मिळायला लागले. पानटपऱ्या गावागावांत निर्माण झाले आहे. गुटखा, खर्रा सहज उपलब्ध होतो. एकवेळ जेवण मिळाले नाही तरी चालेल परंतु गुटखा हवाच अशी अनेकांची अवस्था झाली आहे. आता तर धूम्रपानाकडेही तरुणांचा कल वाढत आहे. खेड्यात कधी तेंदूपत्याची विडी मिळायची त्या खेड्यात आता नामांकीत ब्रँडच्या सिगारेट मिळत आहेत. तरुणही पानटपऱ्यावर धूम्रपानाचा आनंद घेतात. धूम्रपानाबरोबरच आता ग्रामीण तरुणाई दारुच्या आहारी गेली आहे. हातभट्टीची गावठी दारु उपलब्ध असणाऱ्या गावात आता बीअर बार आणि बीअर शॉपी उघडलेल्या आहे.
बदलत्या जीवनमानामुळे मद्यपान फॅशन झाले आहे. अनेक जण दारु पितात घरच्यांना हा प्रकार माहीत होतो परंतु आईवडील मुलांना परावृत्त करीत नाही. पार्टीमध्ये घेतली असे कारण सांगून त्यावर पांघरून टाकतात. मात्र जेव्हा तरुण व्यसनांमुळे हाताबाहेर जातो तेव्हा पालकांचे डोळे उघडतात नंतर मात्र कोणताही उपाय होत नाही. अनेक आजारांना आमंत्रण मिळते. दारुमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे माहीत असतानाही तरुण दारूशिवाय राहत नाही.
ग्रामीण भागातील तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समुदपदेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांची निर्मिती गावांमध्ये करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)