आर्णीत शेकडोंना डायरियाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:33 IST2018-10-19T23:32:17+5:302018-10-19T23:33:40+5:30
नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या कोळवण परिसरात शेकडो जणांना डायरियाची लागण झाली आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे शेकडो लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य विभाग युद्ध पातळीवर उपचार करीत आहे. ४० ते ५० जण आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून जवळपास ५०० रुग्णांची कोळवणमध्येच तपासणी केली जात आहे.

आर्णीत शेकडोंना डायरियाची लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या कोळवण परिसरात शेकडो जणांना डायरियाची लागण झाली आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे शेकडो लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य विभाग युद्ध पातळीवर उपचार करीत आहे. ४० ते ५० जण आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून जवळपास ५०० रुग्णांची कोळवणमध्येच तपासणी केली जात आहे. त्यासाठी तीन आरोग्य केंद्रांच्या चमू पोहोचल्या आहेत.
कोळवण गावात सध्या नालीचे बांधकाम सुरू आहे. याच बांधकाम परिसरातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली आहे. बांधकामादरम्यान पाईप लिकेज झाले. त्यातून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्यात आला. परिणामी गावात डायरियाची साथ पसरली आहे. ५० जणांना तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही रुग्ण खासगी दवाखान्यात तर काही यवतमाळच्या रुग्णालयात गेले आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भवरे यांनी स्वत: कोळवण गावात भेट देऊन पाहणी केली. दरम्यान आर्णी ग्रामीण रुग्णालयासह लोणबेहळ, म्हसोला, सावळी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चमूही कोळवणमध्ये उपचार देत आहे. जवळपास ५०० रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.
पाईपलाईन लिकेजमुळे दूषित पाणी पुरवठा होऊन डायरियाची लागण झाली. याची माहिती मिळताच नगरपरिषदेने ताबडतोब पाईपलाईन दुरुस्त केली. दरम्यान आरोग्य विभाग कोळवणमधील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. दरम्यान आर्णी प्रमाणेच बºयाच गावात दूषित पाणीपुरवठ्याची ओरड होत आहे. वेळीच उपाययोजना गरजेची आहे.