पांढरकवडात काँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:13+5:30
शासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा शासनकर्त्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा खासदार सुरेश धानोरकर यांनी दिला. ते येथील एसडीओ कार्यालयासमोर तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित धरणे आंदोलनात बोलत होते.

पांढरकवडात काँग्रेसचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना खायलाही दाणा उरला नाही. परंतु शासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा शासनकर्त्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा खासदार सुरेश धानोरकर यांनी दिला. ते येथील एसडीओ कार्यालयासमोर तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित धरणे आंदोलनात बोलत होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, या मागणीसाठी खासदार सुरेश धानोरकर, माजीमंत्रीव्दय अॅड.शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, विजय पाटील चालबर्डीकर, मोहन मामीडवार, प्रकाश मानकर, जितेंद्रसिंह कोंघारेकर, घाटंजीचे सहदेव राठोड, कृषीभूषण रामकृष्ण पाटील, मनोज भोयर यांच्यासह अॅड.मोघे, प्रा.पुरके यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टिका केली.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिनूअण्णा नालमवार, जफर पटेल, माजी नगराध्यक्ष शंकर बडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर पाटील , मकरंद सोने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी खासदार सुरेश धानोरकर, अॅड.मोघे, प्रा.पुरके यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने राज्यपालांना उपविभागीय अधिकारी भाग्यश्री सातपुते यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन दिले.