दर्डानगर टाकी भरणे हेच टंचाईचे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:17 IST2018-05-28T22:17:13+5:302018-05-28T22:17:13+5:30
शहरातील तीव्र पाणीटंचाईत टँकरद्वारे पाणी वाटप केले जात आहे. मात्र, हा शेवटचा पर्याय आहे. तत्पूर्वी दर्डानगर टाकी भरून नळाद्वारे पाणी सोडण्याचा पर्याय वापरल्यास शहरातील सहा प्रभागांतील समस्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येऊ शकते. येथील टँकर इतर टंचाईग्रस्त भागात वापरता येतील.

दर्डानगर टाकी भरणे हेच टंचाईचे उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील तीव्र पाणीटंचाईत टँकरद्वारे पाणी वाटप केले जात आहे. मात्र, हा शेवटचा पर्याय आहे. तत्पूर्वी दर्डानगर टाकी भरून नळाद्वारे पाणी सोडण्याचा पर्याय वापरल्यास शहरातील सहा प्रभागांतील समस्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येऊ शकते. येथील टँकर इतर टंचाईग्रस्त भागात वापरता येतील. दर्डानगर टाकीवरून प्रभाग १५, १६, २४, २५, २७, २८ येथे पाणीपुरवठा केला जातो. टंचाईवर मात कशी करता येईल, याबाबत याच प्रभागांतील नगरसेवकांचे चर्चासत्र ‘लोकमत’ कार्यालयात घेण्यात आले. समस्यांचा पाढा वाचण्याऐवजी तातडीने स्थानिक पातळीवर काय नियोजन करता येईल, याचा उहापोह करण्यात आला. सर्व नगरसेवकांनी टँकरऐवजी नळातून पाणी सोडणे हाच पर्याय निवडला. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी, जीवन प्राधिकरण यांच्याकडे सर्वपक्षीय नगरसेवकांकडून पाठपुरावा करण्याबाबत एकमत झाले.
टंचाई नियोजन करताना गोखी प्रकल्पाचा पर्याय ‘लोकमत’ने पुढे आणला. त्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गोखीचे पाणी दर्डानगर टाकीपर्यंत आणण्याचे नियोजन केले. त्यासाठी ४० लाखांपेक्षा अधिकची रक्कम खर्ची घातली. दर्डानगर टाकीतून दोन वेळा विविध प्रभागांत पाणीपुरवठा झाला. नंतर मात्र किरकोळ तांत्रिक अडचणी सांगून ही टाकी भरणेच शक्य नाही, असा कांगावा सुरू करण्यात आला. लोहारा व सुयोगनगर टाकीवरून नळाच्या पाण्याचे नियोजन सुरू आहे. या दोन्ही परिसरात तुलनेने टंचाईची तीव्रता कमी जाणवत आहे. याहीपेक्षा दर्डानगर टाकी ही केंद्रबिंदू असून जवळपास अर्ध्या शहराचा भार या तीन टाक्यांवर आहे. येथील यंत्रणा सुरळीत झाल्यास सव्वालाख लोकसंख्येला दिलासा मिळू शकतो. हाच उद्देश ठेवून ४० लाखांची पाईपलाईन टाकण्यात आली. आता टंचाई अधिक तीव्र झालेली असताना तिचाच नेमका उपयोग जीवन प्राधिकरणाची यंत्रणा करताना दिसत नाही.
टंचाईला केवळ नगरसेवकच उत्तरदायी ठरत आहेत. अधिकारी व साधने उपलब्ध नसतानाही केवळ नागरिकांना हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांवर विसंबून राहावे लागते. टँकरचे नगरसेवकांकडे असलेले नियोजन कर्मचाºयांकडे सोपविण्यात आले. यासोबतच ड्यूटी व त्याच्या सुट्ट्या हाही टँकरसाठी लागू झाली. या उलट नगरसेवक २४ तास उपलब्ध होतो. काम कोणतीही यंत्रणा करो, रोष नगरसेवकालाच सहन करावा लागतो. गोखीच्या पाण्यासाठी क्षमता वाढवून २० लाखा लिटरऐवजी ४० लाख लिटर पाणी शहरासाठी घेण्यात आले. तरीही समस्या कायमच आहे. पाणीपुरवठ्याचे संपूर्ण नियोजन व तांत्रिक काम जीवन प्राधिकरणाकडून केले जाते. नगरपरिषदेने वेळोवेळी आपला लोकहिस्सा तातडीने रोख स्वरुपात उपलब्ध करून दिला. त्यानंतरही प्राधिकरणाच्या स्तरावर नियोजन नसल्याने दर्डानगर टाकीतून नळाद्वारे पाणीपुरवठा रखडल्याचे वास्तव नगरसेवकांनी चर्चासत्रात मांडले.
टंचाई नियोजन खर्चात कुठेही कमतरता नाही. निळोण्यात फ्लोटिंग पंप बसवण्यासाठी १ कोटी ६२ लाख रुपये खर्च केले. यातून केवळ १५ दिवस पाणीपुरवठा झाला. यावरून पैसा व मिळालेले पाणी याचा हिशेब काढल्यास नियोजन किती महाग ठरतेय याचा अंदाज येतो. याउपरही पाणी समस्या कायमच आहे. आता तर हातपंपही एकापाठोपाठ एक बंद पडत आहे. १९७१ च्या दुष्काळात कुपन पद्धतीने पालिकेने पाणी वाटप केले होते. आज मोफत पाणी दिले जात आहे. तरीही नियोजनाच्या गोंधळामुळे टंचाई अधिकच भीषण झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
टँकर हा टंचाईनिवारणाचा पर्याय नसून २०० लिटर पाणी नागरिकांनी १५ दिवस कसे पुरवावे, हे शक्य नाही. एका टँकरने ८० सोसायट्या, झोपडपट्टी आणि सहा हजार घरे असलेल्या प्रभागात वेळेत पाणी पोहोचविणे शक्यच नसल्याची कैफियत नगरसेवकांनी मांडली. टंचाईसाठी ग्रामपंचायती विलीनीकरणाचे सदोष नियोजन कारणीभूत आहे. आज वडगाव रोड परिसरातील वैयक्तिक विहिरी व बोअर आटल्या आहे. पाणीपुरवठ्यासाठी एका नगरसेवकाला किमान चार टँकर आवश्यक आहे. अनेकदा दुरुस्तीचे काम निघाल्याने टँकर पोहोचत नाही. यापेक्षा नळाचा पर्याय उत्तम आहे. दोन तास नळाद्वारे पाणीपुरवठा केल्यास किमान आठ दिवसांची गरज पूर्ण करता येऊ शकते, असे सूचविण्यात आले.
जीवन प्राधिकरण पुरवठा बंद असतानाही पाणीबिल वसूल करीत आहे. टंचाई निवारणाच्या नियोजनास त्यांनी तितक्याच तत्परतेने पुढे येणे गरजेचे आहे. गोखीचे पाणी किती टक्के फिल्टर होते? ते पाणी तुम्ही पिता का? असा प्रश्न नागरिक नगरसेवकांना विचारत आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा हा पर्याय उत्तम असून त्यासाठी सर्वच स्तरातून समन्वय होण्याची गरज चर्चासत्रात स्पष्ट झाली.
तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या जीवन प्राधिकरणाने तातडीच्या पाईपलाईनवर ४० लाख रुपये खर्च केले. आज दर्डानगर टाकीत पाणी चढत नाही, असे हीच अभियंता मंडळी उजळ माथ्याने सांगत आहे. मग झालेल्या खर्चाचे काय, त्याची जबाबदारी कुणावर, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. आज टंचाईत पैसा खर्च होऊनही फायदा होत नाही. पाणी पुरवठ्याबाबत कुठलीही माहिती नसताना नळाचे पाणी येणार, अशा तारखा जाहीर केल्या. त्यामुळे संभ्रम व टंचाईने त्रस्त नागरिकांच्या संतापात भर पडली. यासाठी नगरसेवकांना उत्तरदायी धरले जात आहे. नगरसेवकांनी केवळ नागरिकांच्या शिव्याच खायच्या का, असा प्रश्नही चर्चासत्रात उपस्थित करण्यात आला.
प्राधिकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे लक्ष
दर्डानगर टाकी भरण्याबाबत नगरसेवकांनी उपाययोजना सूचविल्या आहेत. त्याकडे जीवन प्राधिकरणाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठीच नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा मनोदयही चर्चासत्रात व्यक्त केला. ही टाकी भरून नळाद्वारे पाणीपुरवठा झाल्यास शहरातील दीड लाख लोकांपर्यंत गोखीचे पाणी पोहोचेल. प्राधिकरणाने त्यासाठी वेळापत्रक बनावावे. असे झाल्यास टँकरवर होणारा प्रचंड खर्च कमी होईल. शिवाय, आठ-दहा दिवसांनी का होईना पण पाणी मिळण्याची नागरिकांना खात्री वाटेल. टँकरच्या पाणीवाटपावरून होणारे भांडणतंटे कमी होतील. नगरसेवक आणि प्रशासनावरील नागरिकांचा रोषही कमी होईल, असे मत चर्चासत्रात नगरसेवकांनी मांडले. आता जिल्हाधिकारी व प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टंचाई उपाययोजनेबाबत नागरिकांनी द्याव्या प्रतिक्रिया
नगरसेवकांनी पाणीवितरण करताना प्रत्यक्षात राबविणारे उपक्रम व अडचणी यांचा उहापोह ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून केला. या प्रभागातील नागरिकांनीही पाण्यासंदर्भातील अडचणी, सूचना, आपल्या प्रतिक्रिया लिखित स्वरुपात लोकमत कार्यालय, गांधी चौक येथे आणून द्याव्या. जेणे करून त्या वृत्ताच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देता येईल, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे. प्रतिक्रिया पाठविताना प्रभाग क्रमांक, नाव व मोबाईल क्रमांक आवर्जुन नमूद करावा.
‘लोकमत’ कार्यालयातील चर्चासत्राचे हे निघाले सार
दर्डानगर येथील टाकी भरून नळाद्वारे पाणीपुरवठा हाच उत्तम उपाय असल्याचे नगरसेवकांचे एकमत झाले. गोखी प्रकल्पाचे पाणी या टाकीपर्यंत आणण्यासाठी पाईपलाईन तयार आहे. त्याचे ‘टेस्टिंग’ही झाले. दोन वेळा ही टाकी भरून पाणीपुरवठाही करण्यात आला. पण आता जर ही टाकी भरत नसेल, तर त्याची कारणे जीवन प्राधिकरणाने आणि जिल्हाधिकाºयांनी शोधलीच पाहिजे. गोखीच्या पाण्याने सुयोगनगर आणि लोहाराची टाकी भरते, तर दर्डा नगरची टाकीही भरणे आवश्यक आहे. परंतु, सुयोगनगर व लोहाराच्या टाकीचा व्हॉल्व नागरिक परस्पर फिरवतात आणि आपल्या परिसरात पाणी वळवतात. कदाचित त्यामुळेही दर्डानगरच्या टाकीकडे ‘फोर्स’ कमी राहात असावा. त्यासाठी सर्वच टाक्यांवर तातडीने सुरक्षा यंत्रणा ठेवून कुणीही परस्पर वॉल्व फिरविणार नाही, याची दक्षता प्राधिकरणाने घेतली पाहिजे. दर्डानगरच्या टाकीत पाणी भरण्यासाठी १८ तास लागतील, असा प्राधिकरणाचा निष्कर्ष आहे. नाहीतरी सध्या नागरिकांना पाणी मिळतच नाही आहे. तर एकदा ही टाकी भरून घ्यावी, त्यासाठी पूर्ण सम्प भरून टाकीत पाणी चढवावे आणि परत सम्प भरावा, अशा उपाययोजना चर्चासत्रात उपस्थित प्रभाग १६ मधील नगरसेवक नितीन गिरी, प्रियंका भवरे यांच्या वतीने त्यांचे यजमान चेतन भवरे, प्रभाग १५ मधील नगरसेवक सुजित राय, संगीता राऊत यांच्या वतीने यजमान रवींद्र राऊत, प्रभाग २४ च्या नगरसेविका किर्ती राऊत, प्रभाग २८ मधील नगरसेविका रजनी देवकते, स्वीकृत सदस्य दिनेश गोगरकर, यांच्यासह जीवन देवकते यांनी सूचविल्या. दर्डानगर टाकीच्या पायथ्याशी म्हणजेच सम्पमध्ये पाणी पूर्ण क्षमतेने सोडता येते. अडचण आहे ती सम्पमधील पाणी टाकीत चढविण्याची. एवढ्या एका किरकोळ कारणासाठी सहा प्रभागांतील नागरिक होरपळले जात आहे. हाच सार