धरण उशाला अन् कोरड घशाला
By Admin | Updated: October 20, 2014 23:19 IST2014-10-20T23:19:31+5:302014-10-20T23:19:31+5:30
माळपठार भागातील इरापूर धरणाच्या तिरावरील शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च करुन शेतामध्ये पाईपलाईन टाकली. मोटारपंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र भारनियमनाने केवळ चार

धरण उशाला अन् कोरड घशाला
अशोक काकडे - पुसद
माळपठार भागातील इरापूर धरणाच्या तिरावरील शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च करुन शेतामध्ये पाईपलाईन टाकली. मोटारपंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र भारनियमनाने केवळ चार तासही वीज सुरळीत राहत नाही. त्यामुळे ओलित करणे अशक्य होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक उद्धवस्त झाले असताना धरणाच्या तीरावरील शेतकऱ्यांना मोठी आशा होती. मात्र भरनियमनाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले असून धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.
पुसद कृषी उपविभागात सोयाबीनचा पेरा १ लाख ९३३ हेक्टर झाला. पुसद तालुक्यामध्ये ३३ हजार ५६६ हेक्टरवर पेरणी झाली. दिग्रसमध्ये १३ हजार ८३० हेक्टर, उमरखेडमध्ये ३२ हजार ८९० आणि महागांवमध्ये २० हजार ६४७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उशीरा आलेला पाऊस, मध्यंतरी पडलेला खंड, भारनियमन आदींमुळे अडीच क्विंटल बियाण्याला केवळ दोन क्विंटल उत्पादन होत आहे. पेरणी इतकेही उत्पादन होत नाही. त्यात नंतरचा काढणीचा खर्च १५०० रुपये एकरी येत आहे. मळणीयंत्रासाठी ३०० रुपये पोते माजावे लागते. उत्पादनच नाही तर काढणीचा खर्च कुठून करणार. त्यामुळे उभे पीक शेतातच सडू देण्याची वेळ आली आहे. कापूस पिकांचीही तिच अवस्था आहे. उपविभागात ८९ हजार ६३ हेक्टर कापसाची पेरणी झाली होती. पुसद तालुक्यात २२ हजार ५३० हेक्टर, दिग्रसमध्ये १६ हजार ९९७, उमरखेडमध्ये १८ हजार ३५८ हेक्टर तर महागांवमध्ये ३१ हजार १७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. सध्या कापसाची अवस्थ अत्यंत बिकट आहे.
इसापूर धरणाच्या तिरारवर असलेल्या गावांतील धरणग्रस्त शेतकरी नगर जिल्ह्यात नारायणगावला कांदे काढणीसाठी जातात. तेथे मजुरी करुन झालेल्या कमाईत स्वत:ची शेती करतात. होती नव्हती ती कमाई शेतीला पाणी देण्यासाठी घालून विजेअभावी ओलीत होत नसल्याने इथल्या शेतकऱ्यांची अवस्था अधांतरी झाली आहे.
शेतीत काही पिकले तर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होते. गतवर्षी बियाणे निघालेच नाही अन् यावर्षीही निसर्गाने साथ सोडली अशात शासनाकडूनही कोणतीच मदत नाही, त्यामुळे चहुबाजूने शेतकऱ्यांचे मरण झाले आहे. बँका वसुलीसाठी निघाल्या, करोडो रुपयांचा पिकविमा घेतला परंतू पीक उद्ध्वस्त झाल्यावरही काहीच भेटले नाही. गेल्या १० वर्षांपासून शेतकरी विविध संकटाचा सामना करीत आहे. यावर्षी कोरड्या दुष्काळाने मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यातच वीज भारनियमनाने भर घातली आहे. अशा स्थितीत पीक वाचवायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार दिसत नाही.
शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या सातबाऱ्यावर यावर्षी दु:खाची नोंद झाली आहे. असंख्य अडचणींशी झगडणाऱ्या शेतकऱ्याला भयंकर वेदना होत आहेत. शासनाने त्यांना नुकसानीच्या तुलने अधिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.