दुग्ध व्यवसाय डबघाईस
By Admin | Updated: January 3, 2015 02:14 IST2015-01-03T02:14:38+5:302015-01-03T02:14:38+5:30
चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाढती महागाई आणि अल्प उत्पादनाचा हा परिणाम आहे. यामुळेच दुभत्या जनावरांची संख्या घटत चालली आहे.

दुग्ध व्यवसाय डबघाईस
नेर : चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाढती महागाई आणि अल्प उत्पादनाचा हा परिणाम आहे. यामुळेच दुभत्या जनावरांची संख्या घटत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा जोडधंदा दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे. पाकिटचे दूध खेड्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे लोकांना ताज्या दुधाला मुकावे लागत आहे. हिरव्या वैरणावर तणनाशकांचा मारा हे कारणही दुग्ध व्यवसायासाठी मारक ठरत असल्याचे सांगितले जाते.
कडबा, कुटार आणि सिंचनाची सोय असल्यास कडावू हा जनावरांसाठीचा मुख्य चारा आहे. परंतु आता ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात कडबा, कुटार सापडला आहे. सोयाबीन पावसात सापडल्याने ओले झाले. परिणामी ते जनावरांना खाण्यायोग्य राहिले नाही. शेतधुऱ्यावर वाढणारा चारा तणनाशकाच्या कचाट्यात सापडला जातो. शेतात असलेल्या पिकांवर होणारी फवारणी अप्रत्यक्षरीत्या या चाऱ्यावर परिणाम करते.
पावसाळ्यापासून तर हिवाळ्यापर्यंत जवळपास सात ते आठ महिने मिळणारा चारा आता काही दिवसातच संपुष्टात येत आहे. हक्काचे वैरण अल्पावधीतच संपत असल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यातूनच जनावरे विकण्याचा सपाटा सुरू आहे. एकेकाळी घरोघरी असलेले दूधदुभत्याचे भंडार आता हळूहळू कमी होवू लागले आहे. सर्वत्र दुधाची टंचाई जाणवत असल्याचे वास्तव आहे.
मजूर टंचाईमुळे शेतातील तण काढणे कठीण होते. त्यामुळे शेतकरी वर्ग तणांवर फवारणी करतात. याच बाबीही वैरण टंचाईसाठी कारणीभूत ठरत आहे. रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे जमिनीचाही पोत बिघडत चालला आहे. मानवी जीवनावरही त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहे. तणनाशकाच्या अतिरिक्त वापरावर नियंत्रणाची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)