दाभाडीच्या महिलांचा घागर मोर्चा
By Admin | Updated: January 10, 2015 23:03 IST2015-01-10T23:03:54+5:302015-01-10T23:03:54+5:30
झरीजामणी तालुक्याच्या आढावा सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. त्यांना धारेवर धरून जनतेच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश दिले.

दाभाडीच्या महिलांचा घागर मोर्चा
मुकुटबन : झरीजामणी तालुक्याच्या आढावा सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. त्यांना धारेवर धरून जनतेच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश दिले.
झरी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात गुरूवारी ही आढावा सभा घेण्यात आली. तब्बल सहा तास चाललेल्या सभेत जनतेने विविध समस्यांचा पाढा वाचला. आमदारांनी महसूल विभागाच्या कारभारावर तीव्र नापसंती दर्शविली. ही सभा पाणी प्रश्नावर चांगलीच गाजली. ही सभा सुरू होताच दाभाडी येथील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी खुद्द सभास्थळी महिलांनी घागर मोर्चा आणला. आमदारांनी महिलांची समस्या ऐकून घेतली. त्यांना त्वरित समस्या निकाली काढण्याची ग्वाही दिली.
यानंतर जवळपास २० गावांचा पाणी प्रश्न सभेत मांडण्यात आला. आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून पुढाऱ्यांसारखे आश्वासन न देता काम होत असेल तर सांगा, असे खडसावले. वल्हासा येथे मागील १० वर्षांपासून पाणी समस्या असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. धानोरा, लहान मार्की, येदलापूर, गाडेघाट, झरी, अडकोली, मुकुटबन, हिवरा, बोटोणी, बोपापूर, बाळापूर, सुसरीपेंढरी, झमकोला, राजणी, माथार्र्जुन, वरपोड येथील ग्रामस्थांनीही पाणी समस्या कथन केली.
येदलापूर येथे टँकरने पाणी पाठविल्याचे सांगण्यात आले. झरी आश्रमशाळेत विजेअभावी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अडकोली येथे ग्रामपंचायतीला बोअर अधिग्रहण केल्याचे मागील चार वर्षांपासून पैसे न मिळाल्याचे सदस्यांनी सांगितले. मुकुटबन येथील भारत निर्माण प्रकल्पाचा मुद्दाही उपस्थित झाला. माथार्जुन पाणी पुरवठा संदर्भात जागरूक नागरिकांनी हिस्ट्री शीट मागितली. ती अधिकाऱ्यांना देता आली नाही. अनेक सचिवांना प्रश्नांची उत्तरे देता आली नसल्याने गटविकास अधिकारी मेघावत यांनी त्याचा खुलासा करून जनतेला समजाविण्याचा प्रयत्न केला. एका सचिवाच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आमदारांनी दिले.
ग्रामस्थांनी महावितरणप्रती असंतोष दर्शविला. वीज येण्यापूर्वीच खांब उभे केले जात असल्याचे खडकडोहच्या ग्रामस्थांनी लक्षात आणून दिले. खडकी येथील ग्रामस्थांनी शौचालयाचा प्रश्न उपस्थित केला. पंचायत समितीमधील विविध विभागांच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीबाबत गटविकास अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. अन्न पुरवठा, महसूल, भूमिअभिलेख, महावितरण आदी विभागांबाबत सभेत प्रश्नांचा भडीमार झाला. तालुक्यात प्राथमिक शिक्षणाची दशा अत्यंत बिकट असून त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)