जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय, सावधगिरी हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:57+5:30

लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प आहेत. हाताला कामच नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालवायची कशी याचा पेच निर्माण झाला आहे. सेवाभावी संस्थांनी काही दिवस गोरगरिबांना जगविले. एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढते आहे. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्याबाहेर गेलेले हजारो लोक गावात परतले.

Crime is on the rise in the district, precaution is the only option | जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय, सावधगिरी हाच पर्याय

जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय, सावधगिरी हाच पर्याय

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : बेरोजगारी वाढली, झटपट कमाईवर जोर, पोलिसांकडून हवी प्रतिबंधात्मक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना व लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. त्यातच बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांंची भर पडली. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. उपजीविका चालविण्यासाठी बेरोजगारांचे पाय आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहे. त्यांना पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून रोखणे अपेक्षित आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प आहेत. हाताला कामच नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालवायची कशी याचा पेच निर्माण झाला आहे. सेवाभावी संस्थांनी काही दिवस गोरगरिबांना जगविले. एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढते आहे. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्याबाहेर गेलेले हजारो लोक गावात परतले. त्यामुळे रोजगाराची आणखीच मारामार होताना दिसते. कुटुंब जगवायचे आहे, पण हाताला काम नाही अशा स्थितीत काहींच्या मनात ‘झटपट कमाई’ देणारे गुन्हेगारीचे विचार फिरु लागले. काहींनी या विचारांनुसार अंमलबजावणीही सुरू केली. त्यातूनच गेल्या काही दिवसात प्रॉपर्टी आणि शरीरासंबंधीचे गुन्हे वाढल्याचे दिसून येते. चोरी, घरफोडी, मंगळसूत्र चोरी, वाटमारी, वाहन चोरी, मारहाण या सारखे गुन्हे घडत आहे. बेरोजगारीमुळे वाम मार्गाला लागण्याचे प्रकारही घडण्याची भीती आहे. नागपुरात हा प्रकार उघड झाला. औरंगाबादमध्ये बहीण-भावाचा खून करून दीड किलो सोने लुटले गेले. अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसात अनेक घटना राज्यात घडल्या आहेत.
गुन्हा घडल्यानंतर सहसा पोलिसांची भूमिका सुरू होते. परंतु लॉकडाऊनमुळे वाढलेल्या या बेरोजगारीच्या संकटात पोलिसांनी ‘गुन्हा घडूच नये’ या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे. पोलिसांनी सतर्क राहून व गुन्हेगारांवर वचक निर्माण करून जनतेच्या मनातील वाढत्या गुन्हेगारीची भीती दूर करावी, अशी मागणीही होत आहे.
काही भागात रोजगार आहेत, तर कोरोनाच्या भीतीने तेथे मजूर नाहीत आणि गावखेड्यांमध्ये मजूर आहेत तर तेथे रोजगार नाहीत. अशा विसंगत स्थितीमुळे भविष्यात गुन्हेगारी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र पोलिसांनी वेळीच उपाययोजना करून ही संभाव्य वाढती गुन्हेगारी थांबविणे कठीण नाही. त्यासाठी पोलिसांच्या व्यापक नियोजन, उपाययोजना व त्याच्या अंमलबजावणीची तेवढी गरज आहे.

पोलिसांवर अवलंबून राहू नका, स्वत:च स्वत:ची सुरक्षा सांभाळा
लॉकडाऊनचा परिणाम पुढे किमान वर्ष-दोन वर्षे राहील असा अंदाज आहे. ते पाहता भविष्यात गुन्हेगारीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने कायम सावध राहणे हाच पर्याय आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अगदीच तुटपुंजी आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांवर अवलंबून न राहता स्वत:च स्वत:ची सुरक्षा करणे, वेळोवेळी खबरदारी घेणे हाच मार्ग स्पष्ट दिसतो आहे. सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहे. नागरिकांनी सावध राहून आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत:च्या मालमत्तेचे स्वत:च रक्षण करणे गरजेचे झाले आहे. बँक-ऑनलाईन व्यवहाराची गोपनीयता महत्वाची ठरते.

Web Title: Crime is on the rise in the district, precaution is the only option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.