सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा
By Admin | Updated: May 27, 2014 01:09 IST2014-05-27T01:09:52+5:302014-05-27T01:09:52+5:30
अतिक्रमण करून लावलेल्या टपरीसमोर दुचाकी ठेवून अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा सुरळीत करण्यास गेलेल्या उपसरपंचासह १० गावकर्यांशी वाद घालून टपरी

सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा
हिवरी : अतिक्रमण करून लावलेल्या टपरीसमोर दुचाकी ठेवून अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा सुरळीत करण्यास गेलेल्या उपसरपंचासह १० गावकर्यांशी वाद घालून टपरी चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यात धक्काबुक्की झाल्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. आर्णी मार्गावरील मनदेव येथे रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता सरपंच, उपसरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला. सरपंच अनिल कोंडबाजी पारधी, उपसरपंच सुरेश भीमराव फुपरे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू तुळशीराम तडसे, विष्णू नारायण फुपरे, विश्वंभर नारायण मीरासे, दिनेश विश्वनाथ पारधी, पुंडलीक विठोबा महाजन, संतोष देवराव हगवने, मंगेश नरहरी वाघमारे सर्व रा. मनपूर आणि मारोती महादेव अमरे रा. अर्जुना अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहे. दिगंबर महादेव राठोड रा. सेंदूरसनी, असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. दिगंबरचा मेव्हणा सोपान जाधव रा. बोथबोडन याने मनदेव येथे अतिक्रमित जागेवर टपरी थाटली आहे. रविवारी रात्री टपरीसमोर वाहने ठेवून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याची माहिती मिळताच सरपंच पारधी, उपसरपंच फुपरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तडसे हे गावकर्यांसह तेथे गेले. यावेळी त्यांनी टपरी चालक सोपानची समजूत घालून वाहतूक अडथळा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र सोपानने काहीएक ऐकून न घेता त्यांनाच दिगंबरच्या मदतीने शिवीगाळ केली. तसेच त्यांच्याशी झटापट केली. त्यानंतर दिगंबरने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता या प्रकरणात गावकर्यांवरच मारहाण आणि टपरीतील साहित्याची नासधूस केल्याचा गुन्हा नोंदविला. तसेच गावकरी ज्या वाहनातून तेथे आले होते ते वाहनही जप्त केल्याचा आरोप गावकर्यांकडून केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे. (वार्ताहर)