तीन लाख विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:41+5:30

जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दरवर्षी दिली जातात. समग्र शिक्षातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपरिषदेच्या शाळा, शासकीय शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरतात. गेल्या वर्षी १७ लाख ३ हजार १२ पाठ्यपुस्तके जिल्ह्याला मिळाली होती.

Create free books for three lakh students | तीन लाख विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके तयार

तीन लाख विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके तयार

ठळक मुद्देयाच महिन्यात येणार : बालभारतीने मागविली साठवणुकीच्या जागांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संकटामुळे पुढील शैक्षणिक सत्र केव्हा सुरू होणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र नव्या सत्रासाठी नवी कोरी पुस्तके छापून तयार आहेत. विशेष म्हणजे, ही पुस्तके याच महिन्यात जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यंदा जिल्ह्यातील २ लाख ८८ हजार २७० विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी जिल्ह्याने नोंदविली आहे.
जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दरवर्षी दिली जातात. समग्र शिक्षातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपरिषदेच्या शाळा, शासकीय शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरतात. गेल्या वर्षी १७ लाख ३ हजार १२ पाठ्यपुस्तके जिल्ह्याला मिळाली होती. यंदा त्यापेक्षाही अधिक पुस्तके मिळण्याची शक्यता आहे. कारण २०१८-१९ या सत्राच्या यू-डायस आकडेवारीनुसार विद्यार्थीसंख्या गृहित धरून बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यासाठी सोळाही पंचायत समितीस्तरावरून आकडेवारी घेण्यात आली आहे. त्यात मराठी, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बालभारतीच्या पुण्यातील मुख्य डेपोतून पुस्तके रवानाही झाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अमरावतीच्या डेपोतून ही पुस्तके मिळणार आहेत. त्यासाठी सोळाही तालुक्याच्या ठिकाणी पुस्तकांची साठवणूक करण्याची ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे. मेअखेरीस या सोळा ठिकाणी थेट अमरावतीतून पुस्तके पोहोचणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

एकात्मिक पुस्तकासाठी दारव्हा तालुक्याची निवड
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी यंदा बालभारतीने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक’ प्रकल्प सुरू केला आहे. यात एका वर्गाचे सर्व विषय मिळून एकच पुस्तक तयार करण्यात आले आहे. मात्र ही पुस्तके यंदा सर्वत्र पोहोचणार नसून प्रायोगिक तत्वावर काही तालुक्यात दिली जाणार आहे. त्यात यंदा दारव्हा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. दारव्हातील उपयागीता लक्षात घेऊन पुढील सत्रात एकात्मिक पाठ्यपुस्तके सर्वांना मिळण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Create free books for three lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा