सीसीआयच्या केंद्रांवर आजपासून कापूस खरेदी; तांत्रिक अडचणीमुळे ठप्प होती उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:01 IST2025-02-24T17:59:12+5:302025-02-24T18:01:09+5:30
बाजार समितीत पत्र धडकले : १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली

Cotton procurement at CCI centers from today; Turnover was halted due to technical difficulties
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सीसीआयच्या १५ केंद्रांवर ११ फेब्रुवारीपासून अचानक कापूस खरेदी बंद करण्यात आली. तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी बंद केली असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले होते. १४ दिवसानंतर सोमवार, २४ फेब्रुवारीपासून पुन्हा कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे. याबाबतचे पत्र बाजार समितीत धडकले आहे.
यवतमाळ कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे २५ लाख क्विंटल कापूस खरेदी - विक्रीची उलाढाल होते. यावर्षी सीसीआयने झरीवगळता सर्व १५ तालुक्यात कापूस खरेदी केंद्र उघडले. ११ फेब्रुवारीपूर्वी या केंद्रांवर १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. कापसाची आवक वाढत असताना सीसीआयने खरेदीला ब्रेक लावला तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी केली जाणार नाही, असे जाहीर केले.
जिल्ह्यात पूर्वी सीसीआय आणि पणन महासंघाकडून कापूस खरेदी होत होती. तसेच खासगी बाजारातही व्यापारी कापूस खरेदी करायचे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पर्याय होते. परंतु, पणन महासंघाची यंदाही केंद्र शासनाने सब एजंट म्हणून नियुक्ती केली नाही. परिणामी शेतकऱ्यांना सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अशा स्थितीत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून १४ दिवसांपासून कापूस खरेदी केंद्रे बंद ठेवण्यात आली. दरम्यान, सीसीआयने सोमवारपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे यंत्रणेपुढे असणार आव्हान
अजूनही पाच ते सहा लाख क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. केंद्र सुरू होताच शेतकरी कापूस विक्रीसाठी गर्दी करणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान यंत्रणेपुढे असणार आहे.
१४ दिवसांत मोठी उलाढाल
सीसीआयने तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून कापूस खरेदी केंद्रे बंद केली. अशावेळी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नव्हता. गत १४ दिवसांत खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी - विक्रीतून मोठी उलाढाल केल्याचे ऐकायला मिळत आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही झाली आहे. मात्र, प्रशासनाचे व्यापाऱ्यांवर कुठलेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे यंत्रणेपुढे असणार आव्हान
अजूनही पाच ते सहा लाख क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. केंद्र सुरू होताच शेतकरी कापूस विक्रीसाठी गर्दी करणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान यंत्रणेपुढे असणार आहे.